गावची जत्रा


आमचा माळशेज घाटाचा सगळा पट्टा तसा सधन. पावसावर होणारी शेती अगदीच नावाला किंवा मग गरजेपुरती. म्हणजे बाजरी, ज्वारी यासाठी. आमच्या वरच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण जास्त. त्यामुळे तेथे मात्र भातशेतीच प्रमुख. साधारण घाटाच्या अलीकडील, म्हणजे कोळेवाडी, मढ, करंजाळे वगैरे पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या कुशीत वसलेली गावे. भात खावा तर याच भागातला. आजी सांगायची, “भाताच्या पेजेत वात वळून लावली तर दिवा पेटायचा आणि भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा.” अर्थात पिढ्या दर पिढ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा घसरत गेला. तरी आजही पानात मढचा भात नाही पडला तर घास गिळत नाही हे खरे.

माझ्या आजीचे माहेर मढ. म्हणजे वडलांचे आजोळ. आताच्या काळात कोण इतकी जुनी नाती सांभाळत बसणार आहे? पण या तांदळाच्या मोहाने मी मढबरोबरचे माझे नाते अगदी घट्ट ठेवलेय. एकवेळ मी माझ्या आजोळी जाणार नाही, पण वडलांच्या आजोळी जायची टाळाटाळ करणार नाही. अहो, हातसडीचा तांदूळ म्हणजे काय हे माहीत नसण्याच्या या काळात, माझ्या घरी वर्षभराचा हातसडीचा तांबूस गुलाबी तांदूळ मढहून घरपोच होतो. जुन्नरला उजव्या हाताला ठेवत मढहून खाली उतरले की कोळेवाडी, डिंगोरे करत मग ओतूर लागते. हेच माझे गाव. गावाचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती. ओतूर माझे गावही आणि आजोळही. कारण आई याच गावातली. अर्थात मामाचे घर गावापासून चार साडेचार किलोमीटर दूर मळ्यात होते. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायचे म्हणजे चालतच जायचे. रस्ता जरा दुरून जायचा. पण आम्ही कधी रस्ते वापरलेले आठवत नाही. आमच्या शेताच्या बांधावरून चालायला सुरवात केली की मग या शेताचा बांध, त्या शेताचा बांध असे करत करत तासाभरात रमतगमत, चिखलाने पाय, कपडे बरबटत आम्ही मामाच्या विहिरीवरच पोहचायचो. विहीर अगदी चिरेबंदी बांधलेली होती. तेथे हातपाय धुवून मग मामाच्या घरी. कधी कधी तर विहिरीवर हातपाय धुवून तेथेच विहिरीत लोंबकळणारी सुगरणींची घरटी काढत रमायचो. मामाचे केव्हातरी लक्ष गेले की मग आमची वरात घरी जाई. मीठमिरची आणि भाकरीचा तुकडा उतरून टाकला की मगच आजी घरात घ्यायची. मग नवीनच आलेली मामी चार दिवस फक्त आमच्याच सरबराईत असायची. मामी गोरीपान नसली तरी छान होती. ती आम्हा लहान मुलांना अहो-जाहो करायची. कारट्या, गाढवा असल्या हाका ऐकायची सवय असलेल्या आम्हाला ते तर भारीच वाटायचं. माझा चुलत भाऊ तर अगदी लहान होता. तोही हट्ट करून आमच्याबरोबर यायचा. भीती वाटते म्हणून शी करायला मामीला सोबत घेऊन जायचा. मामीच्या एका हातात तांब्या आणि दुसऱ्या हाताचे बोट धरून भाऊ. शी झाली की शर्ट वर करून पोटाजवळ धरून मामीसमोर वाकून उभा रहायचा.

त्या वेळेसही मामी त्याला अहोजाहो करत म्हणे, “अहो नीट उभे रहा पाहू. शर्ट वर धरा अजून...” आमची तर हसून हसून मुरकुंडी वळत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचे वेगवेगळे प्लॅन असत. पण त्या यादीत मात्र मामाकडे जाणे नसायचे. दिवाळीलाही एखाद दिवस आम्ही मामाकडे जाऊन यायचो. पण श्रावण महिना सुरू झाला की कधी एकदा मामाकडे जातो असे व्हायचे. आमच्या भागातल्या बहुतेक गावांच्या यात्रा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे असायच्या. किंवा त्याच्या आगेमागे असायच्या. या यात्राही साधारण तीन दिवस चालत; पण उन्हाळ्यातच. आमच्या गावची यात्रा मात्र श्रावण महिन्यात यायची. श्रावणात जितके सोमवार असतील तितके दिवस यात्रा. बरेचदा चार दिवस, तर कधी कधी पाच दिवस. म्हणजे दर सोमवारी यात्रा भरे. मग आमची यात्रेची तयारी सुरू व्हायची. श्रावण सुरू व्हायच्या आधी पावसाचा अंदाज घेऊन मामाकडे जायचे. मग मामा आम्हा सगळ्यांना त्याच्या शिंप्याकडे घेऊन जाई. शर्ट आणि चड्डीची मापे दिली जात. मग दुपारपर्यंत मामा आम्हाला घरी सोडीत असे. नंतर पहिल्या सोमवारची वाट पहाणे एवढेच काम असे. अधूनमधून शिंप्याकडे चक्कर मारून बटणं लावायची राहिली आहेत फक्त.हे ऐकून यायचे. मला आठवत नाही तेव्हापासून ते अगदी बारावीपर्यंत आमचा हाच शिंपी होता. आणि इतके वर्षे आमची त्याच्याकडची चक्कर आणि त्याचे ठरलेले उत्तर काही बदलले नाही कधी. अगदी मापे दिल्यानंतर तासाभरातच जरी विचारले, भरतकाका, कपडे?तरी काका म्हणणार, झालेच, फक्त बटणं लावायची आहेत.

कपड्यांचे काम उरकले की वडील आम्हाला ‘बापूसाहेबाकडे पाठवायचे. बापूसाहेब म्हणजे आमचा फॅमिली डॉक्टरसारखा फॅमिली न्हावी. त्याच्या दुकानात दोन खुर्च्या आणि दोन मोठे आरसे असत. आडव्या फळीवर त्याची हत्यारे असत. भिंतीवर एक चामड्याचा जाड पट्टा टांगलेला असे. तो एका हातात धरून दुसऱ्या हाताने बापु वस्तरा वरखाली फिरवत च्यटक-फटॅक असे मजेशीर आवाज काढे बराच वेळ, मग गिऱ्हाइकाची दाढी करायला घेई. आमची कटींग मात्र खाली मांडी घालूनच करी. आरसा नाही नि काही नाही. त्याच्यासमोर मांडी घालून बसलो की मान त्याच्या ताब्यात द्यायच्या अगोदर मी त्याला सांगायचो, “हे इथले केस मोठेच ठेव, इकडचे जरा जरा बारीक कर, भांग इकडून पडला पाहिजेवगैरे. बापू अगदी लक्षपूर्वक ऐकून घेई. मग एकदा त्याच्या मशीनचे कट कट सुरू झाले की संपेपर्यंत मान वर करायची सोय नसे. थ्रीडी साउंडसारखा त्याच्या हत्यारांचा आवाज डोक्याच्या वेगवेगळ्या भागातून येत राही. अचानक गाफील असताना बापू एकदम भुस्स भुस्स करीत पाण्याचा फवारा उडवी आणि श्वास अडकल्यासारखे होई. खसाखसा डोके स्वच्छ पुसून बापू एखादी लाकडी पेटी झटकावी तसे माझ्या अंगावरचे केस झटकी. मग मी बापूची कलाकारी पहायला आरशासमोर उभा राही. आणि दरवेळेप्रमाणे बापूने आमचा पार भोपू केलेला असे. वडिलांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे काम झालेले असे. मग आम्ही भावंडे नाराज होऊन घरी यायचो.
आम्ही लहानपणी जी लाकडी खेळणी खेळलो त्या खेळण्यांचे स्टॉल्स
आयपॅडच्या जमान्यातही दिसतात.
हीच यात्रांची खरी ओळख आहे असे मला तरी वाटते
अर्थात ही नाराजी सकाळपर्यंतही टिकत नसे हा भाग वेगळा. कपडे, केस या गोष्टी झाल्या की आमची श्रावणाची तयारी होई. श्रावणात आम्ही मुले फारच आज्ञाधारक, शिस्तीचे वगैरे व्हायचो. आईनी सांगितलेली कामे त्वरीत करायची, अभ्यास वेळेवर करायचा, मस्ती कमी करायची, अश्या विविध मार्गाने आम्ही आईपर्यंत ‘आम्ही शहाण्यासारखे वागतोहे पोहचवायचो. कारण ‘यात्रेत खाऊ आणि खेळणीयासाठी किती पैसे मिळणार ते या शहाणपणावरच अवलंबून असे.
यात्रेत प्रवेश करतानाच ही हळदी-कुंकवाची,
 गुलालाची दुकाने दिसतात
हळुवारपणे श्रावण येई. पहिल्या सोमवारी असणाऱ्या यात्रेत आम्हा मुलांना फारसा रस नसायचा. पहिल्या सोमवारी घरातली सगळी मोठी माणसे पहाटेच उठून दर्शनाला जाऊन येत. मग दिवसभर दर्शनासाठी रांगच लागे. यात्रेतली खेळण्याची दुकाने, पाळणे, मिठाईची दुकाने यांची मांडामांड पहिल्या सोमवारी सुरू होई. त्यांनाही पहिल्या सोमवारी फारशी गिऱ्हाईके नसतच. पहिल्या दिवशी फक्त पेढ्यांची आणि बत्ताश्यांची दुकाने लागत. अधूनमधून अबीर-गुलाल, हळद-कुंकू यांची चमकदार रंगाची दुकाने असत. त्या रंगांच्या पार्श्वभूमीवर तुळशी आणि बेलपानांची दुकाने खूप खुलून दिसत. श्रावणातल्या सरींचा आणि उन्हाचा खेळ सुरू असे. शंकराचे मंदिर आणि केशव चैतन्यांची समाधी मांडवी नदीच्या काठी आहे. गावापासून जरा दूर. आजूबाजूला शेती. 

"चला घरी." आमच्या शेतातून घराकडे परतणारे भाविक
त्यामुळे या यात्रेसाठी बरेच जण आपल्या शेताचा काही भाग न पेरता तसाच ठेवत. यात्रेकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांपैकी एक रस्ता आमच्या शेतातूनच जाई. पण आजोबा इतरांसारखे शेत मोकळे न ठेवता त्यात मेथी, कोथिंबीर, गाजर यासारखे काही ना काही लावत असत. अर्थात हे यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी असे. ज्याला जे हवे ते त्याने घेऊन जावे हा हेतू असे. 

दुसऱ्या सोमवारी मात्र सकाळी सकाळी वडील आम्हाला यात्रेसाठी थोडे थोडे पैसे देत. अर्थात कित्येकदा हे पैसे खर्चही होत नसत. एकदा आम्हा मित्रांची टोळी यात्रेत घुसली की खाऊ वगैरे घ्यायचे भानच रहात नसे. कारण यात्रेसाठी येणारे पाहुणे खूप खाऊ घेऊनच येत. यात्रेत गेल्यावर पहिल्यांदा दर्शन घेतले की मग आम्ही उंडारायला मोकळे. दिवस कसा जाई हे समजतही नसे. सूर्य अस्ताला गेलेलाही ढगांमुळे कळत नसे. यात्रेतले पेट्रोमॅक्स लागायला सुरवात झाली की पावले घराकडे वळत. आम्हा भावंडांना अंगणात रांगेत उभं करून आई कडकडीत पाण्याने अंघोळ घाली. अर्थात यात श्रावणाचा किंवा सोमवारच्या उपवासाचा काही भाग नसे. आम्ही चिखलाने इतके बरबटलेलो असायचो की अंघोळीशिवाय घरात पाऊल टाकणेच शक्य नसे. एकदा कढत पाण्याने अंघोळ केली की मग मात्र दिवसभर न जाणवलेली भूक जाणवे. आजोबांनी केळीची पाने आणलेली असत. या महिन्यात बाबांसाठी बेलाची पाने आणि आईच्या वेगवेगळ्या व्रतांसाठी ‘पत्रीआणायचे काम आम्हा मुलांकडेच असे. पण केळीची पाने आणायचे काम फक्त आजोबाच करत. तेही महिनाभर. केळीच्या बागेतून निवडून अशी पाने आणत जी तशीही कापायचीच असत. एकवेळ पत्रावळीवर उपास सोडतील, पण केळीची चांगली आणि कोवळी पाने कधी तोडत नसत. आम्ही म्हणायचो, “आपले आजोबा जरा विचित्रच आहेत नै?”

सगळीकडेच खेळण्यांची दुकाने दिसतात, पण यात्रेत सगळ्यात जास्त आवाज असतो बासऱ्यांचा आणि पिपाण्यांचा
मग सगळ्यांची पंगत बसे. आजोबा नैवेद्य दाखवत. एक नैवेद्याचे पान गोठ्यात जाई. एक पान शेतातल्या विहिरीला जाई आणि मग पंगत सुरू होई. आई सुगरणच होती, पण श्रावणाच्या महिन्यात तिच्या हाताला काय सुंदर चव येई! मग आमची अंथरुणे पडत आणि निजानीज होई. कित्येकदा अती भटकण्यामुळे पाय असह्य दुखत. अशा वेळी आई माझे पाय चुरून देत असे. आई पाय दाबत असतानाच आम्ही मुलं पुढच्या सोमवारची स्वप्ने पहात झोपी जात असू.
आम्ही जसजसे मोठे होत गेलो तसतशी यात्रेतली आमची आकर्षणे बदलत गेली. यात्रा तीच होती, तशीच होती पण आमची जाण वाढली आणि आवडीनिवडी बदलायला लागल्या. नववी-दहावीला असताना आम्हाला यात्रेतले पाळणे न दिसता कुस्तीचे आखाडे दिसायला लागले.
कुस्तीच्या आखाड्याचा पॅनोरमा

कुस्तीचा आखाडा नाही ती खरी यात्राच नाही
आजोबा थकले होते. ते म्हणायचे, “तो जटाधारी गाभाऱ्यात नाही बसला तुमच्या शिवामुठींची आरास पहायला. तो बसलाय आखाड्यात. एका मुठीतून दुसऱ्या मुठीत जाणारी लाल माती पहात. त्याचं दर्शन घ्यायचं असेल उतरा आखाड्यात.”

त्यामुळे सहावीपासूनच आम्ही यात्रा पहायला जाताना चड्डीच्या आत लंगोट कसूनच जायचो. यात्रेत भटकून होईपर्यंत दुपार व्हायची आणि आखाडा माणसांनी फुलायला लागायचा. आमची पावलेही तिकडे वळायची. पहिले दोन तास आमच्यासारख्या पहिलवानांच्या कुस्त्या व्हायच्या. अर्थात बक्षीस असायचे दहा रेवड्यांचे. त्या कुस्त्यांना नावच मुळी ‘रेवड्यांच्या कुस्त्याअसे. आम्ही चड्डी-शर्ट काढून आखाड्यात उतरायचो. या आखाड्यात मात्र आजोबांचा दरारा काही कामी येत नसे. येथे खरी कुस्ती होई. ‘रावबा पाटलाचा नातूम्हणून आमची गय केली जात नसे, लाडही केले जात नसत. पहिल्या काही कुस्त्या मी हरत असे. पण ‘जोपर्यंत समोरच्याला आभाळ दाखवत नाही तोपर्यंत आखाडा सोडणार नाहीही खुमखुमी असल्यामुळे पाय रोवून दुसरी जोड शोधत असे. तास दोन तास प्रयत्न केले की मग कुठे कुणाला तरी आस्मान दाखवण्यात यश येई आणि हातात दहा रेवड्या पडत. मला आजही आठवते, दहा रेवड्या आणि भगवा पटका हे बक्षीस असले तरी मी कधी पटका बांधून घेतला नाही. रेवड्या शर्टमधे बांधून एका बगलेत दाबायच्या तर दुसऱ्या बगलेत पटक्याची घडी दाबायची. आणि नुसत्या लंगोटावर शेताच्या बांधावरून उड्या मारत, ओरडत घरी यायचे. बाकी भावंडे आणि मित्र जयजयकार करायला असायचीच. आमचा गदारोळ ऐकून आजोबा बाहेर येत. त्यांच्या हातावर पटका ठेवायचा आणि त्यावर रेवड्या ठेवायच्या. आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटायचे. मग आजोबा पटक्याची घडी मोडून मला चांगला घट्टमुट्ट फेटा बांधायचे. वर छान तुरा काढून द्यायचे, पाठीवरचा पटक्याचा शेव खांद्यावरून पुढे काढायचे. बाबांना, आईला दाखवले की अंगणातल्या अंघोळीच्या दगडावर बसायचे. आई पटक्याला सांभाळत मानेपासून खाली अंघोळ घाली. पदर भिजवून त्याने तोंड स्वच्छ पुसून देई. खास या वेळेसाठी राखून ठेवलेला ड्रेस काढून देई. ते नवीन कपडे घालून, थोडंस दूध वगैरे पिऊन आम्ही सगळी मुले मग मावळत्या उन्हात, बाहेरून आलेल्या पहिलवानांच्या कुस्त्या पहायला परत यात्रेकडे निघायचो.


हे आपले सहज जाता जाता क्लिक केले होते
प्लॅस्टीकच्या वस्तू आता जास्त दिसायला

लागल्या आहेत यात्रेतही
पुढे कॉलेजला गेल्यावर मात्र हा कुस्त्यांचा आखाडा फक्त पहाण्यापुरता उरला. त्यात उतरायची धुंदी कमी कमी होत जाऊन शेवटी संपली. आता नामांकित पहिलवानांच्याही कुस्त्या पहायला जाण्यात रस राहिला नाही. आजोबाही राहिले नव्हते. रात्रीची जेवणे उरकून नऊदहा वाजता आमची पावले यात्रेकडे वळू लागली. आज कोण आलंय? याची चौकशी व्हायची. आवडता गायक असेल तर फर्माईशी आठवून ठेवायच्या. त्या हट्टाने गायला लावायच्या. पहाटेच्या भैरवीनंतरच आम्ही घराकडे परतायचो. रात्रभर रंगलेल्या भजनातल्या काही काही जागा अगदी डोक्यात बसलेल्या असायच्या. त्या मनातल्या मनात घोळवतच अंगणात पाऊल पडायचं. एव्हाना आई उठलेली असे. ती सडा घालायचे काम थांबवून विचारी, एवढ्या वेळ थांबतं का रे कुणी भजनाला! अंघोळ कर आणि मग झोप हवं तितकं.

पोटामागे शहरात आलो. मित्रही कुठे कुठे व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने पांगले. काही गावीच
ही आमची मांडवी नदी
राहिले. आता वर्षातून दोनतीन वेळा सगळे एकत्र येतो. त्यातल्या त्यात यात्रेला आवर्जून. मग दहाअकरा वाजता सगळे मिळून दर्शनाला जातो. दर्शन झाले की तसेच मंदिराच्या पलीकडील बाजूला उतरून नदीकाठी निवांत जागा पाहून बसतो आणि यात्रेजवळच बसून यात्रेच्याच आठवणी काढत रहातो.
किती वर्षे झाली, मी यात्रेला जाऊनही यात्रा पाहिलीच नाही. या वेळी नेमकी रविवारी नारळीपौर्णीमा आली. मग फोनाफोनी करून सगळ्या भावांना कल्पना दिली. दुपारपर्यंत एक एक करत सगळे जमा झालो. मुलांनी एकच कल्ला केला. राख्या बांधल्या गेल्या. नारळीभाताची पंगत झाली. रात्री ढगातून चंद्र कधी दिसत होता, कधी नाहीसा होत होता. अंगणात चटया टाकल्या. सगळ्या पोरांना गोळा केलं आणि ‘आमच्या लहानपणीची यात्राकशी होती ते तास दीड तास भान हरपून सांगत बसलो. आश्चर्य म्हणजे मुलांनी सगळे डोळे मोठे करीत ऐकले. आयपॅड, मोबाईल गेमची कुणी आठवणही नाही काढली. "आम्हालाही यात्रा पहायची आहे!” चा गजर झाला. मला बरे वाटले. ‘आपल्याला वाटते तेव्हढी काही मुले गावाला दुरावली नाहीत अजूनहे पाहून भरूनही आले. सकाळी भरपूर खिचडी आणि दह्याचा नाष्टा करून आमची मिरवणूक यात्रा पहायला घरातून बाहेर पडली. आणि या पोरांच्या नादाने मी परत एकदा ती लहानपणीची आमची यात्रा डोळे भरून पाहिली. 
हा चिमुरडा हार विकताना दिसला... (या वयात आम्ही मस्ती करायचो)
तीच गोडी शेवेची दुकाने, अबीर-गुलालाची ताटे, तेच लाकडी बैल आणी बैलगाड्यांचे स्टॉल्स, प्रसादाचे पेढे आणि बर्फीची ताटे, उत्साहानी ओसंडणारी रंगीबेरंगी माणसे, गृहपोयोगी वस्तूंच्या दुकानांच्या जरा सुधारीत आवृत्या. दर्शन झाले, केशव चैतन्यांच्या समाधीवर सगळ्या पोरांनी
पूर्वीची चव राहिली नसली तरी ही शेव मात्र
अनेक यात्रांत दिसतेच. जणू या शेवेशिवाय यात्रा होणारच नाही
मनोभावे डोके टेकवले. समाधीच्या आवारात बसून ‘तुकाराम महाराजांचे सद्गुरू केशव चैतन्य आहेतहे सांगून त्यांची छोटीशी कथा मुलांना ऐकवली. तोपर्यंत आखाडा माणसांनी फुलला होता. त्या गर्दीत प्रत्येकाला आळीपाळीने खाद्यावर घेऊन दंगल दाखवली. हायजीन-अनहायजीनचा विचार न करता मुलांना रेवडी, गोडी शेव खाऊ घातली. गेले दहा वर्षे एक काका यात्रेला न चुकता हजेरी लावतात. ते स्टीलच्या ताटावर वेळू ठेवून त्यातून आवाज काढतात आणि त्या तालावर कबिराची भजने म्हणतात. आम्ही त्यांना कबीरकाकाच म्हणतो. मुलांना त्यांची भजने ऐकवली. वेळूतून आवाज काढून पाहिला मुलांनी. नवीन काहीतरी पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हळू हळू यात्रेतल्या पाळण्यांवरची रोषणाई चमकू लागली तसे आम्ही घराकडे वळालो. सगळ्या बच्चेकंपनीला अंघोळी घातल्या. केळीच्या पानावर पंगत बसली. हसतखेळत पोरांची जेवणे उरकली. सगळ्यांची झोपायची सोय करून मग आम्ही सगळे जेवायला बसलो. गप्पा मारत, आईच्या चौकशीला उत्तरे देत देत जेवणे उरकली. झोपायच्या अगोदर मुलांकडे एक चक्कर टाकली. दहा वाजले असावेत. सगळे गाढ झोपले होते. दिवसभरात एकदाही शहराची आठवण न आलेली पिल्ले मस्त एकमेकांच्या अंगावर हात-पाय टाकून झोपली होती. झोपेतही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते. या सगळ्या मुलांमध्ये मला माझेच बालपण दिसत होते.
हा पाळणा लहान मुलांचे प्रमुख आकर्षण. (मी मात्र आजवर कुठल्याही छोट्या मोठ्या पाळण्यात बसलो नाही)
काढा कधीतरी वेळ आणि या आमच्या यात्रेला. आमची यात्राच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुकाच अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात तर त्याच्या सौंदर्याला अगदी भरती येते.


पद्मनाभ डुंबरे

1 comment:

  1. खूप छान लिहिलं मित्रा! मलाही माझ्या गावाकडच्या बहिरमच्या यात्रेची आठवण झाली!

    ReplyDelete