गीताई : अध्याय ५ - कर्मसंन्यास योग




मागच्या ज्ञानकर्म संन्यास योगात श्रीकृष्णांनी अर्जुनाला "जीवीचे गूज" म्हणजे अगदी खास 'secret' ज्ञान सांगितले, स्वतःच्या परमेश्वर रूपाची ओझरती ओळख करून दिली. कल्पना करा, युद्धक्षेत्र आहे. जीवन-मरणाचा, आप्तेष्टांना जीवे मारण्याचा बांका प्रसंग आहे. अशा वेळी कृष्ण अर्जुनाला कर्मयोग सांगतात आणि ज्ञानयोगही सांगतात; अर्जुन पेचात न पडता तरच नवल!

या अध्यायात एकूण २९ श्लोक आहेत आणि अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते.

कृष्णा संन्यास कर्माचा तसा योगही सांगसी    
दोहोंत जे बरे एक सांग ते मज निश्चित

हे श्रीकृष्णा, तू एकीकडे कर्माचा संन्यास घ्यायला सांगतोस आणि दुसरीकडे योग म्हणजे ज्ञान मार्गाचे आचरण करायलाही सांगतोस. या दोघांत जे एक उत्तम असेल ते सांग. मानवी स्वभावाची एक खासियत इथे पाहायला मिळते. आपल्या जगण्यात नेहमीच आपल्याला विकल्पांना सामोरे जावे लागते आणि जेव्हा एकापेक्षा जास्त विकल्प असतात तेव्हा बुद्धी भ्रमित होते. कुठला विकल्प जास्त फायदेशीर ठरेल हे सहज ठरवता येत नाही. पण अर्जुनासमोर प्रत्यक्ष भगवान उभे आहेत, त्यामुळे तो थेट कृष्णालाच विचारतो. दोन्हीत काय चांगले ते सांग.
श्रीकृष्ण म्हणतात -
योग संन्यास हे दोन्ही मोक्ष साधक सारखे
विशेषची परी योग संन्यासाहुनी मानिला


कर्मसंन्यास आणि कर्मयोग दोन्ही एक समानच आहेत. दोन्ही आत्म्याला मोक्ष, मुक्ती प्राप्त करून देऊ शकतात. परंतु कर्मयोग हा सामान्य माणसाला आचारण्यास सोपा आहे. त्यामुळे तो अधिक विशेष आहे.

तो जाण नित्य संन्यासी राग द्वेष नसे जया
जो द्वंद्वावेगळा झाला सुखे बंधातूनी सुटे


मला हा श्लोक फारच महत्त्वाचा वाटतो. विशेषतः आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी. यात भगवान म्हणतात, की कर्मयोग आचरणारा सामान्य माणूस जेव्हा राग आणि द्वेष यापासून मुक्त होऊन आपले काम करत राहतो तो संन्याशासारखाच असतो. जो द्वंद्वातून मुक्त झाला, म्हणजे ज्याच्याकडे clarity of thought आहे, समोर विकल्प आले तरीही ज्याचे मन द्विधा होत नाही, तो सर्व बंधनांतून सुटतो, मुक्त होतो. It's a guideline for our day-to-day work. अशी अवस्था कशी प्राप्त करावी हे भगवंतांनी पुढे या अध्यायात समजावून सांगितले आहे.

सांख्यास जे स्थान ते योग्यास लाभते
एकरूपची हे दोन्ही जो पाहे तोची पाहतो
योगावाचुनी संन्यास कधी साधेची ना सुखे
संयमी योग जोडुनी ब्रह्म शीघ्रची गाठतो

श्रीकृष्ण म्हणतात की जे सांख्यांचे (ज्ञान) महत्त्व आहे तेच कर्मयोग आचरणाऱ्यांचे आहे. ज्याला हे दोन्ही समान वाटतात किंवा ज्यांना ज्ञान आणि कर्म सारखेच वाटतात, ते खऱ्या अर्थाने डोळस आहेत. कर्मयोग किंवा इंद्रियांच्याद्वारे कर्म करावे लागणे हे अटळ आहे. त्यामुळे संन्यास मार्ग आचरणाऱ्यालासुद्धा कर्म हे करावेच लागते. जो माणूस संयम राखून कर्मयोगाचे आचरण करतो तो लवकरच परब्रह्म परमेश्वरापर्यंत पोहोचतो.

काही करी मी ऐसे योगी तत्वज्ञ जाणुनी
देखे, ऐके, शिवे, हुंगे, खाय, जाय, निजे, श्वसे
बोले, सोडे, धरी किंवा पापणी हालवी जरी
इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हेची पाहतो


इथे श्रीकृष्णांनी आपल्या दैनंदिन कर्मांची, जसे की झोपणे, उठणे, श्वास घेणे इतकेच काय तर पापणीची हालचाल या अगदी सामान्य क्रियांची उदाहरणे देऊन यात आपण काहीच करत नाही. या क्रियांचा 'मी' हा कर्ता नाही, हे जो जाणून असतो तो खरा योगी असे सांगितले आहे. अगदी खरे सांगायचे तर आपल्यात केवढा अहंकार असतो. मी केले, मी केले... पण आपल्या अस्तित्वाचे, चालण्या-फिरण्याचे, श्वसनाचे, पचनाचे कशाचेही श्रेय आपण घेऊ शकत नाही. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा अनेक 'systems' आपल्या शरीरात आपण काहीही न करता आपोआप चालू असतात. आपण आपल्याही आतल्या व्यवस्था जर स्वतः चालवत नाही तर आपण अहंकार कशाचा करतो? जेव्हा या गोष्टीचे भान येते तेव्हा अहंकार गळून पडतो.


ब्र ब्रह्मी ठेऊनिया कर्मे संग सोडूनि जो करी
पापेंन लिप्त तो होय पद्म पत्र जसे जळे


कमळाचे पान जसे पाण्यात राहूनही ओले होत नाही, तसे जो माणूस निःसंग होऊन कर्माचे आचरण करतो, तो त्याची कर्मे ब्रह्मार्पण करत असतो. पाप त्याला स्पर्श करू शकत नाही.


युक्त तो फळ सोडून शांती निश्चित पावतो
अयुक्त स्वैर वृत्तीने कर्म आसक्त बांधला


कर्मयोगी, कर्मफळाचा त्याग करून परम शांती प्राप्त करून घेत असतो. पण सकाम कर्मे करणारी व्यक्ती त्याला श्रीकृष्णाने "अयुक्त" अस म्हटलेले आहे. ही व्यक्ती आपल्या आसक्त वृत्तीने कर्माच्या फळाशी बांधली जाते. यातले 'युक्त' आणि 'अयुक्त' हे दोन्ही शब्द मला आवडले. आपण ते बोली भाषेत फारसे वापरत नाही पण या श्लोकाच्या संदर्भात ते एकदम चपखल बसतात. पुढचा श्लोक interesting आहे.


मनाने सगळी कर्मे संयमी सोडूनि सुखे
नवद्वार पुरी राहे करी ही करवी ही ना


इथे कृष्णाने आपल्या शरीराला ९ द्वारे असलेल घर म्हटले आहे. मी खरेच ही नऊ दारे मोजून पहिली आणि ती ९ च आहेत. अशा या ९ द्वारांच्या घरात राहणारा जो आतला "मी" आहे, तो जेव्हा संयमाने सगळी कर्मे स्वतःला अलिप्त ठेवून करतो, तेव्हा तो ती करत असूनही "करी ही ना करवी ही ना" अशी त्याची अवस्था असते. तो जे काही करतो ते तो करतच नाही आणि कोणाकडून करवूनही घेत नाही. आपल्या कर्तेपणाचा अहंभाव बाजूला ठेवून कर्म करणे हे किती आवश्यक आहे, हे श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा अधोरेखित करत राहतात.


कर्तेपण लोकांचे, कर्मे निर्मितो प्रभु
कर्मी फल संयोग स्व-भावे सर्व होतसे


परमेश्वर ना कर्म निर्माण करतो, ना तो लोकांचे कर्तेपण निर्माण करतो. कर्म आणि त्याचे फळ अथवा कर्माचा परिणाम हे दोन्हीही या स्वभावाने निर्माण होत असतात. ह्यालाच इंग्रजीत आपण Nature म्हणतो आणि त्याचाच अर्थ मराठीत निसर्ग तर हिंदीत प्रकृती असा करतो. पहा म्हणजे कृष्ण याचे credit स्वतःकडे घेत नाहीत. Very interesting!
आपली श्वसनाची प्रक्रिया कशी होत असते? 'Cell respiration’ वरचा एखादा youtube video बघा. आपण एक श्वास घेणे आणि सोडणे एवढ्या एका प्रक्रियेत किती chemical reactions होत असतात, त्याची साखळी पाहिली तर अचंबित व्हायला होते. मनात येते, खरेच आपल्याला एक शरीर आणि एक नाव काय मिळाले, की आपण मी... मी... मी... करत फिरत असतो. आपण खरे तर फक्त निसर्गातले अणूरेणू असतो एकत्र आलेले. निसर्गात घडणाऱ्या इतर सर्व घडामोडींसारखे आपले शरीर आणि त्यातून उत्पन्न होणारी कर्मे ही आपोआप घडत असतात. आपले "मी"पण संपवणारा आणि निसर्गरूप होऊन प्रकृतीशी तादात्म्य पावण्याची जाणीव करून देणारा हा विचार आहे.


घे पाप कोणाचे वा पुण्य ही तो विभु
अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित


परमेश्वर कोणाचेच पाप-पुण्य काही घेत नसतो. मानवी जीवनात अज्ञान, वास्तवाची जाणीव नसणे, ज्ञानाचा अभाव असणे यामुळे माणूस सतत कशा ना कशामुळे मोहित होत असतो.


गेले अज्ञान ते ज्यांचे आत्म ज्ञाने तया मग
परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले


जेव्हा माणसाचे अज्ञान दूर होऊन त्याला कर्ता आणि कर्म या विषयीचे आत्मज्ञान प्राप्त होते तेव्हा सूर्यप्रकाश पडल्याप्रमाणे परब्रम्ह दिसू लागते.


इथेची जिंकिला जन्म समत्वी मन रोवूनी
निर्दोष सम जे ब्रह्म ज्ञाने तेथेचि स्थिर


श्रीकृष्णाचे हे विधान मला खूप आवडले. 'इथेची जिंकिला जन्म'... जन्म जिंकणे ही कल्पना फार मोठी आहे... आपण जन्माला येऊन जीवन जगतो, पण जन्म जिंकणे ही फार पुढची आणि उच्च पातळीवरची गोष्ट आहे. आणि जो सर्व भेदांना समभावाने पाहू शकतो, वरवर दिसणाऱ्या भेदांच्या आड लपलेल्या एकाच चिरंतन शक्तिरूपाची ज्याला जाणीव असते तो सच्चिदानंद परब्रह्म रूपात एकरूप होऊ शकतो.


प्रिय लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये
बुद्धी निश्चळ निर्मोह ब्रम्ही ज्ञानी स्थिरावला
विटला विषयी जाणे अंतरी सुख काय ते
ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय


आवडणाऱ्या गोष्टी मिळाल्यावर आनंद आणि न आवडणाऱ्या गोष्टी वाट्याला आल्या तर उद्वेग असे ज्यांचे होत नाही, ज्यांची बुद्धी स्थिर, निश्चल, सम आणि निर्मोही झाली आहे असा ज्ञानी मनुष्य ब्रह्मावस्थेत पोहोचतो. जो विषयविकारात अडकला त्याला आतून सुख-शांती मिळत नाही. जो ब्रह्मात मिसळतो तो न संपणाऱ्या सुखास पात्र होतो. आपल्यासाठी बघायचे झाले तर मनाची स्थिरता, विचारांची स्थिरता हे आपण प्रयत्नांनी आणू शकतो. आपल्या मनाचा द्रव सुखदुःखाच्या परिणामांनी हिंदकळू दिला नाही तर आपण एखाद्या योग्याप्रमाणे शांतिरूप सुख अनुभवू शकतो.
पुढे भगवान म्हणतात -
विषयातील जे भोग ते दुःखासची कारण
येती तसे जाती, विवेकी रमे तिथे


विषय म्हणजे ज्या गोष्टी लालसेने किंवा फळाच्या इच्छेने लिप्त असतात त्या परिणामी दुःखाला कारणीभूत ठरतात. सोपे करून सांगायचे तर अपेक्षा = दुःख, लालसा = दुःख.
"येती तसे जाती विवेकी रमे तिथे."  ही फार सुंदर ओळ आहे. विषय कोणाच्या समोर येत नाही? सर्वच जण त्यात रमतात आणि सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत राहतात. पण विवेकी, म्हणजे ज्याला 'सद्' आणि 'असद्', किंवा 'चांगले' आणि 'वाईट' याची जाण असते अशी व्यक्ती विषयात रमत नाही. त्यांच्याकरता विषय हे जसे येतात तसे निघून जातात.

प्रयत्ने मरणापूर्वी या देही जिरवू शके
काम क्रोधातील वेग तो योगी खरा सुखी
प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया
ब्रम्ह होऊनी तो योगी ब्रह्म निर्वाण मेळवी

मृत्यूपूर्वी जो काम, क्रोध यातला वेग, आवेग जिरवू किंवा हरवू शकतो तो खरा सुखी मनुष्य. आपल्यासाठी घ्यायचा बोध म्हणजे राग कमी करायला हवा. मोह कमी करायला हवा. आपल्या सामान्य माणसाच्या जीवनाला साजेल अशी मोक्षाची, निर्वाणाची संकल्पना भगवान इथे मांडतात. ज्या व्यक्तीच्या मनाला स्थिरता प्राप्त झाली, जे मन विकारविरहित प्रकाशमान झाले ती व्यक्ती स्वतः ब्रह्मरूप होऊन मोक्ष मिळवते. आपल्याला पार मोक्षापर्यंत जायचे नाहीये, पण आपल्या रोजच्या असमाधानापासून जरी मुक्ती मिळाली तरी खूप आहे.
पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात -

फिटले दोष शंकाही मुठीत धरले मन
पावले ब्रह्म निर्वाण ज्ञानी विश्व हिती रत


"मनाला मुठीत धरणे" what an idea! आपणजीव मुठीत घेऊन धावत सुटलोअसे म्हणतो, पण मनाला मुठीत धरल्याचे कधी ऐकले नव्हते. मन हे इतके सर्वव्यापी आहे की त्याला मुठीत धरणे शक्य तरी आहे का? पण ज्याच्या सर्व शंका फिटल्या आहेत, ज्याने परमज्ञान प्राप्त केले आहे, जो मनाला नियंत्रित करू शकतो तो मुक्ती मिळवू शकतो. 'कर लो दुनिया मुठ्ठी में'च्या ऐवजी कृष्ण म्हणतात 'कर लो मन मुठ्ठी में' however mind is bigger than world. पण आता हे अवघड काम कसे साधायचे? तर इथे श्रीकृष्ण ध्यान किंवा meditation करण्याची कृती सांगतात.

विषयांचा बहिष्कार, डोळा भ्रू संयमी स्थिर
करुनी नासिका स्थानी प्राणापानही सारखे
आवरी मुनी मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धी जो
सोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटलाची तो

असे आता भय, क्रोध सोडा म्हणून सांगून किंवा सोडतो असे म्हणून थोडेच सुटणार आहे? It needs practice and training. त्याकरिता ध्यान-धारणा करण्याची गरज असते. श्रीकृष्ण विषयांचा बहिष्कार करून भुवयांच्या मध्ये चित्त एकाग्र करून नाकाने प्राण आणि अपान म्हणजे श्वास आणि उच्छवास यांना सारखे, सम किंवा नियंत्रित करून प्राणायाम आणि meditation करायला सांगतात.

Krishna the great!

क्रमश:
अलका देशपांडे


No comments:

Post a Comment