गीताई : अध्याय ३ - कर्म योग




सांख्य योगात शोक करणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्ण आत्म्याच्या ज्ञानाची आणि कर्मयोगाची तोंडओळख करून देतात, तसेच समबुद्धी, स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणें सांगून मनाची शांती मिळवण्यासाठी राग-द्वेषापलीकडे जावे लागते हेही सांगतात.


आता अर्जुन बराच गोंधळून जातो. स्वाभाविक आहे... इकडे कृष्ण आत्म्याचे ज्ञान सांगतात, तिकडे निष्काम कर्मयोग सांगतात... नेमके  करायचे काय? का काहीच नाही करायचे?

अर्जुन विचारतो-

बुद्धी कर्माहूनि थोर मानिसी तू जनार्दना
मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा?

कृष्णा, बुद्धी जर कर्माहून थोर आहे तर मी कशाला या युद्धकर्माच्या भानगडीत पडू? अर्जुनाचा हा प्रश्न रास्त आहे.

मिश्र बोलूनी बुद्धीस जणू मोहात टाकीसी
ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित

एक काय ते नीट सांग बाबा... अर्जुन म्हणतो.

कर्मयोगात एकूण ४३ श्लोक आहेत. भगवान विस्ताराने कर्म योगाविषयी पुढे सांगतात.

दुहेरी या जगी निष्ठा पूर्वी मी बोललो असे
ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करोनिया
न कर्मारंभ टाळुनी लाभे नैष्कर्म्य ते कधी
संन्याशाच्या क्रियेनेंचि कोणी सिद्धी न मेळवी
कर्मविण कधी कोणी न राहे क्षण मात्रही
प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितातची

श्रीकृष्ण इथे अर्जुनाला दोन निष्ठांविषयी सांगतात. एक ज्ञानाने प्राप्त होते, दुसरी कर्माच्या आचरणाने. मात्र कर्म टाळून, निष्कर्माने कधीही सिद्धी मिळवता येत नाही. कितीही ज्ञान प्राप्त झाले, तरीही आपण सारे प्रकृतीच्या गुणांनी बांधले गेल्याने, क्षणमात्रही कर्माशिवाय राहू शक नाही. फार महत्त्वाचा आहे हा नियम. पुढे श्रीकृष्ण मार्गदर्शन करतात -

जो इंद्रिये मनाने ती नेमूनी त्यांस राबवी
कर्मयोगात निःसंग तो विशेषची मानिला

शेवटी इंद्रियांना आज्ञा कोण देतो? मन, बुद्धी, मेंदू. पण ती कर्मे आपल्याला निःसंगपणे म्हणजे कर्तव्यबुद्धीने करताना, त्यांच्या बऱ्या-वाईट परिणामांच्या अपेक्षेपासून अलिप्त राहून करता आली तर ते विशेष आहे.

नेमिले तू करी कर्म, करणे हेची थोर की
तुझी शरीर यात्राही कर्मावीण घडेची ना

मला इथे 'शरीर यात्रा' हा शब्द खूप आवडला. एका पेशीपासून सुरू झालेली आपली शरीर यात्रा आणि जन्म, बाल्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि मृत्यू या अवस्थांतून जाणारे आपले शरीर...अशी ही शरीर यात्रा कर्माशिवाय घडू शकत नाही. त्यामुळे विहित कर्म करणे  हेच श्रेष्ठ आहे. पुढे श्रीकृष्ण यज्ञ, त्यातून निर्माण होणारी फलप्राप्ती, आणि ते फळ स्वतः ग्रहण न करता देवांना अर्पण करण्याचे महत्त्व या विषयी सांगतात. तो भाग फारसा relevant वाटला नाही त्या मुळे पुढे सरकते.

परी आत्म्यांत जो खेळे आत्मा भोगूनि तृप्त जो
आत्म्यामध्येच संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले
केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा
कोणामध्ये कुठे त्याचा न काहीं लोभ गुंतला
म्हणुनी नित्य निःसंग करी कर्तव्य कर्म तू
निःसंग करिता कर्म कैवल्य पद पावतो

हा जो बोध कृष्णाने केला आहे ती जीवनाची गुरुकिल्ली आहे. फार कठीण असते निःसंगपणे काम करणे, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आपण "what is there for me? " हे शोधत असतो. आपली प्रत्येक कृती ही आपल्या फायद्याच्या, सुखाच्या इच्छेने प्रेरित असते. निःसंगपणे काम करणे सहज जमते का आपल्याला? आपल्याला कोणी साधे thank you म्हटले नाही, आपल्या कामाची दखल घेतली नाही की आपले किती बिघडते

आपले सगळे moods हे कर्मफळाच्या उत्पत्तीवर अवलंबून असतात. पण दुसऱ्यांना सावली मिळावी म्हणून वृक्ष लावणारा एखादा शेतकरी, सावलीचा स्वतः उपभोग घेण्याइतकाही जगणार नसतो. पण तरीही तो झाडे लावतो. मला वाटते हेच असावे निःसंग कर्म... "आत्म्यामध्येची संतुष्ट त्याचे कर्तव्य संपते"  अशी ती स्थिती असावी.

पुढे भगवान म्हणतात-

जे जे आचारी तो श्रेष्ठ ते तेची दुसरे जन
तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते
करावे मिळवावेसे नसे काहीं जरी मज
तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागितोची की

हे अर्जुना, श्रेष्ठ व्यक्ती जे आचरतात, त्यालाच आदर्श मानून लोक तसेच वर्तन करतात. त्यामुळे मला स्वतःला जरी काहीं करायचे किंवा मिळवायचे नसले, तरीही मी स्वतःही नित्यपणे कर्माचे आचरण करतो. पुढे कृष्ण म्हणतात-

मी चि कर्मी वागेन जरी आळस झाडुनी
सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग

गीता मला का जवळची वाटते माहिती आहे? ती माझ्या-तुमच्यासारख्या माणसांना तितकीच applicable आहे, जितकी अर्जुनासाठी होती. कालाती असे हे ज्ञान हजारो वर्षांनंतर आजही तितकेच relevant आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मीही आळस झाडून कामाला लागलो, तर लोक माझे अनुकरण करतील. पुढचा श्लोक छान आहे.

कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे
अहंकार - बळे मूढ कर्ता मी हेची घेतसे

कर्म करावे लागणे हा निसर्गाचा नियम आहे, पण मूर्ख माणसे मात्र मीच सगळ्याचा कर्ता आहे असा अहंकार बाळगत असतात.

मज अध्यात्म वृत्तीने सर्व कर्मे समर्पूनि
फलाशा ममता सर्व सोडूनि झुंज तू सुखे

This is the point... कृष्ण अर्जुनाला कुठल्याही फळाची आशा, ममत्व न ठेवता तू युद्ध कर असे  सुचवतात.

हां, पण कृष्ण अर्जुनाला इथे सावधही करतात...

इंद्रिय सेविता अर्थ राग द्वेष उभे तिथे
वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोर चि

राग, द्वेष हे चोराप्रमाणे तुला आसक्त करण्यासाठी उभे असतील. तू त्यांना वश होऊ नकोस.
आपल्या रोजच्या कामातही आपल्याला कितीदा किती लोकांचा राग येतो. का येतो राग? याच्या मुळाशी गेले तर आपल्याला कळते, की आपण सगळ्या कामात स्वतःकडून आणि दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो. आणि त्या पूर्ण झाल्या नाही, की चिडचिड करत काम करत राहतो. आत्मावलोकन करायला लावणारा श्लोक आहे.

पुढच्या श्लोकाचा अर्थ वाचताच कळेल, या श्लोकाचा हिंदू धर्म आणि संस्कृतीवर अमीट प्रभाव आहे.

उणा ही आपुला धर्म पर-धर्माहूनि बरा
स्व धर्मातला भला मृत्यू पर-धर्म भयंकर

अर्जुनही 'चला, आता मला सगळे समजले. आता लढू या' असे म्हणत नाही. He still has lots of questions to ask. तो विचारतो -

मनुष्य करितो पाप, कोणाच्या प्रेरणेमुळे?
आपुली नसता इच्छा वेठीला धरला जसे

इथे हसू येते. अर्जुनाचा प्रश्न अगदी योग्य आहे. इतके सगळे तू छान छान सांगतोयस, तर मग माणसे पाप का बरं करतात? कोण दुर्वर्तन करून घेते त्यांच्याकडून?
आता पहा भगवान काय सांगतात-

धुराने झाकला अग्नी, धुळीने आरसा जसा
वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे जसे
कामरूप महा अग्नी नव्हें तृप्त कधीची तो
जाणत्याचा सदा वैरी त्याने ज्ञान झाकिले

इथे "काम" हा शब्द तथाकथित "काम" या अर्थाने नसून इच्छा, अपेक्षा, लालसा, कामना या सर्वांसाठी मिळून वापरला आहे. धुराने अग्नी किंवा धुळीने आरसा जसा झाकला जातो, तसेच लालसेने लुब्ध माणसाचे ज्ञान, विचारशक्ती झाकली जाते. थोडक्यात लाभाच्या मोहात पडलेली व्यक्ती खोल, दूरगामी, प्रगल्भ विचार करू शकत नाही.

पुढे भगवान सांगतात-

इंद्रिये बोलली थोर, मन त्याहुनी थोर ते
बुद्धि थोर मनाहुनी, थोर त्याहुनी तो प्रभू

या श्लोकात सांगितलेली ही जी hierarchy आहे ही गीतेने आपल्याला establish करून दिली आहे आणि I think as a culture fundamentally we believe in it. आपले शरीर, ज्यामार्फत आपण पंचेंद्रियांनी संवेदना अनुभवतो, श्रेष्ठ आहेच; पण त्याहून श्रेष्ठ माणसाचे मन आहे, त्याच्या भावना आहेत. कारण त्या भावना त्याचे outer expression बनून जगासमोर त्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात. त्या मनाहूनही श्रेष्ठ बुद्धी असते, जी योग्य-अयोग्य यातला भेद जाणते, ज्ञानाचा संग्रह करते, विचार करते आणि स्वैर धावू पाहणाऱ्या इंद्रियांचे आणि मनाचे नियमन करते. पण या सर्वांच्या परे आहे तो "प्रभू" म्हणजे परमेश्वर जो शक्ती रूपात, आत्म्याच्या रूपात आपल्या शरीरातील चेतना जागृत ठेवून आपल्याला जीवित ठेवतो, अस्तित्व देतो.

मला वाटते कर्मयोग हे शाश्वत ज्ञानभांडार आहे. It's a simple rule book for life. कर्म करणे हे अटळ आहे... ते कसे करावे आणि कसे करू नये हे कर्मयोग सांगतो.

क्रमश:

अलका देशपांडे




No comments:

Post a Comment