जगू या आनंदे -९

 

Interpersonal Relationships

परस्पर नातेसंबंध - नाव आणि नाते  यांचा परस्परांशी किंवा एकमेकांशी निकटचा संबंध आहे. नातेसंबंध कधी आपोआप जुळतात, तर कधी जोडले जातात. याचे स्वरूप काम, कौटुंबिक, मैत्रीपूर्ण असे काहीही असू शकते. नाती निभावताना यात सकारात्मकता आणि सलोखा कसा आणि का जपायचा याचे  कौशल्य जाणून घेऊया.

सर्वप्रथम आपले स्वतःशी नाते - याचा अर्थ माझा स्वभाव, विचार, व्यक्तिमत्व, वागणे, बोलणे, याची मला पुरेशी ओळख आहे का? हे समजून घेणे फायद्याचे असते. यामुळे नातेसंबंध निभवायला सोपे जाते. उदा. मला चार माणसांत राहणे आवडते की मी एकटी/एकटा खुश असतो/असते का? हे माहित असले, तर त्यानुसार आपल्या वागण्या-बोलण्यात सहजता येते. किंवा वाटले तर आपण बदल करू शकतो. विनाकारण होणारे गैरसमज टळतात. गैरसमज झाले तर त्यांचे निराकरण करायला सोपे जाते.

 संबंध आणि त्याचे महत्व- आपली support system

नवी नाती, जुनी नाती, त्यांना असणारे अर्थ, हे काळाच्या संदर्भात बदलत असतात. नाते  आणि संबंध याची संकल्पना बदलते. विशेषतः उतारवयात किंवा अडचणीच्या काळात भावनिक, मानसिक आधाराची गरज असते. आपल्याला समजून घेणारे कोणीतरी सोबत हवे  असते. काही वेळेस भांडणं, गैरसमज होऊन जर नात्यात दरी निर्माण झाली तर संबंध बिघडायला वेळ लागत नाही तसेच समजुतीने सोडवता येतात.

कामाच्या ठिकाणी अनेकांबरोबर जुळवून एकत्र काम (team work) करावे लागते. कामे करून घ्यावी लागतात. इथे  ही सहकाऱ्यांशी (colleagues) संबंध सलोख्याचे असतील तर त्यांचेकडून आवश्यक ते सहकार्य मिळून काम पूर्ण करणे सोयीचे जाते.

कुटुंबात सामोपचार असेल तर चांगल्या-वाईट प्रसंगी सगळे एकत्र येऊन एकमेकांच्या सुख दुःखात सामील होतात. आता विभक्त कुटुंब असल्याने शेजारधर्म फार महत्वाचा ठरतो. सध्याच्या बिकट परिस्थितीत व्हाट्सअँप आणि इतर सर्वांइतकेच हे सख्खे शेजारी महत्वाची भूमिका बजावतात. घरात, कामाच्या ठिकाणी वातावरण अजिबात तणावपूर्ण राहत नाही.

नातेसंबंध (maintain किंवा Manage) म्हणजे प्रस्थापित आणि व्यवस्थापित कसे ठेवायचे? याचे हे तंत्र आणि मंत्र आहे .त्यात मी व्यवहारात उपयोगी आणि जमतील अशा तीन गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. त्याला मी 3C model असं म्हणते.

 Connect - Choose - Commit


 

पहिला C- (Connect with me) यात स्वत:ला आधी जाणून घ्यायचे. कारण आपल्या वागण्या बोलण्यामुळे इतरांना आपण दुखवत तर नाहीत ना? याचा विचार करता येतो. आपले विचार काळाबरोबर बदलले आहेत ना? नवीन शिकायची गरज असेल त्याला माझी तयारी असते ना? माझ्यातल्या हट्टीपणा वा हेकेखोरपणे  बोलण्यामुळे आपले संबंध बिघडत नाही ना? कारण हे समजल्यावरच आपल्याला दुसऱ्यांना समजून घेता येते.

एक उदाहरण सांगते. एक आजी पडल्या. त्यांना पायाला plaster/traction घालावे लागले. त्यामुळे त्यांची बाथरूमला जायची पंचाईत झाली. तेंव्हा डॉक्टरांनी त्यांना थोडे दिवसांसाठी adult diaper वापरावा असा पर्याय सुचवला. त्यांनी तो इतका सहजी स्वीकारला. त्यामुळे घरातील सर्वांना  आणि त्यांना स्वतःलाही खूप सोईचे झाले. घरातील आनंदाने त्यांचे करत होते. बघता बघता आजी परत चालायला लागल्या.

 

आता आपण दुसऱ्या C- (Choose) कडे येऊ. काही वेळा नाती अशी असतात की धड सांभाळता येत नाहीत पण तोडताही येत नाहीत. अशा वेळी स्पष्ट बोलून नात्यांतील  कडवटपणा दूर करता येतो. शेवटी ते नाते कसे  जपायचे, जपायचे किंवा नाही हे सर्वस्वी व्यक्ती सापेक्ष असते. अनेकदा त्या व्यक्तीचा निर्णय हा अनुभवावर आधारलेला असतो. काही वेळेस पर्याय नसतो. अशा वेळी LET GO हा मंत्र बऱ्याच वेळेला कामी येतो. पण तोही परिस्थितीवर अवलंबून असतो. पण याचा फायदा खूप होतो. डोक्याला फार त्रास होत नाही. मात्र काही झाले तरी त्या व्यक्तीची प्रतिक्रिया सोडून द्यायची असते. ती व्यक्ती नव्हे..... हे पक्के लक्षात ठेवायचे.

 

शेवटचे C- (Commit) - नाती जपताना, आपण आपला वेळ, भावनिक, मानसिक, शारीरिक, कष्ट, आर्थिक अशा बऱ्याच प्रकारची गुंतवणूक केलेली असते. याची जाणीव दोघांना म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्याला असली पाहिजे. यामुळे नाते निभावताना दोन्हीकडून योग्य प्रतिसाद आणि प्रतिक्रिया येतात. कारण commitment व नाते निभावण्याची क्रिया ही एकांगी असू शकत नाही. एकांगी असेल तर ते नाते  फार काळ टिकत नाही.

बऱ्याच वेळी नात्यात तडजोड असते. दुसरे माझ्याविषयी काय विचार करतील? किंवा मी अशी वागले तर लोक, नातलग, सहकारी काय म्हणतील? असा विचार मनावर कायम एक ओझं तयार करत असतो. कोणतेही ओझे  फार काळ वागवले  तर त्याचा भार सहन करता येत नाही. मग "माझ्या मनात नव्हते तरी ...... " अशी  वाक्याची सुरुवात वारंवार होते. नात्यात कडवटपणा येतो. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था होते. त्यापेक्षा काय वाटते ते स्पष्ट बोला, सांगा आणि नंतर काय करायचे याचा परिस्थितिचा विचार करून निर्णय घ्या. दोषारोप (Blame) कोणालाही नको असतात. त्याचबरोबर अपराधीपणाची भावना(Guilt) ही नको वाटते.

 

एकटे  (alone) असणे वाईट नाही पण एकाकी (lonely) नको.

मनापासून जपूया नाती, लोकसंग्रह हीच खरी संपत्ती

 

या संदर्भात कोणालाही अधिक मार्गदर्शन हवे असल्यास जरूर संपर्क साधावा.

Poorva.ranade@gmail.com


डॉ.पूर्वा रानडे. Ph.D. (Psy.)




No comments:

Post a Comment