मधले पान


कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.


Source: Google
एप्रिल २३ हा जगभर पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. १९९५ पासून साजरा केला जाणारा हा दिवस पुस्तकांबरोबर पुस्तकांच्या copyrights बद्दलही जागरूक करणारा आहे. म्हणजे लेखनाच्या लिखाणाच्या कौतुकाबरोबर त्यांच्या बौद्धिक श्रमाचा योग्य मोबदला त्यांना मिळेल याची काळजी घेणारा दिवस. तेव्हा पुस्तकं वाचा पण चकटफू नको!



बंगलोरमध्ये १८ तारखेला मतदान होतं. १९ तारखेला गुड फ्रायडे होता - तो एक सण नेहेमी शुक्रवारीच येतो, तेव्हा सर्व जातीधर्माच्या लोकांच्या आवडीचा. त्यात मतदान करायची प्रचंड मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या मायबाप सरकारने सुट्टी दिलेली - नव्हे सक्तीच केलेली. चार दिवस सुट्टी म्हटल्यावर काय मज्जाच - मतदान काय, इतर जण बघतीलच! - या भावनेने बऱ्याच लोकांनी तो साजरा केला - पर्यायाने मतदानाची टक्केवारी घसरली.

Source: Google


१३ एप्रिलला जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षं झाली.  भारतीय इतिहासातले किंबहुना जगाच्या इतिहासातले एक अत्यंत काळेकुट्ट प्रकरण म्हणता येईल. जनरल डायर हा स्वभावात:च क्रूर होता, का तो त्या वेळी अत्यंत घाबरलेला होता, का हातात असलेल्या बंदुकीचा माज त्याच्या डोक्यात गेला होता - हे कळायला मार्ग नाही. इंग्लंडला परतल्यावर डायर उपेक्षेचे जीवन जगला हे सत्य. जे काही झालं त्याबद्दल सरकारी पातळीवर माफीची अपेक्षा ही रास्त आहे. अर्थात सध्याच्या ब्रिटिश सरकारची अत्यंत गोलमाल गुळमुळीत प्रतिक्रिया सगळ्यांचीच निराशा करून गेली यात शंका नाही. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही याचं हे उत्तम आणि खेदकारक उदाहरण.

source: Google
निवडणुकीच्या कोलाहलात एकही उमेदवार उभा न करता आणि कुठल्याच पक्षाचं थेट नाव न घेता प्रचार करत; मनसेचे राज ठाकरे यांनी आपण बिनमहत्त्वाचे नाही हेच सिद्ध केलय. सध्याच्या नेत्यांमध्ये एक उत्तम वक्ता  म्हणून प्रसिद्ध असलेले राज ठाकरे हे अत्यन्त नाट्यमय पद्धतीने आपले मुद्दे लोकांसमोर आणताहेत - नुकत्याच झालेल्या एका प्रचारसभेतल्या त्यांच्या "...तो व्हिडीओ लावा रे..." या वाक्याने सध्या धमाल उडवून दिली आहे. whatsapp वर या वाक्यावर येणारे वेगवेगळे मिम्स याची प्रचिती देतात.

source: Google

महिन्याच्या मध्यावर ईस्टरच्या प्राथर्नामध्ये मग्न असलेल्या श्रीलंकेतल्या ख्रिश्चन बांधवांवर ८ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ले करत दहशतवादाने परत आपलं भीषण अस्तित्व सिद्ध केलं आहे. याचा परिणाम दूरगामी होणार यात शंका नाही. २५० लोकांचा मृत्यू  त्यांच्या नातेवाईकांसाठी विसरणे कठीण आहे. त्यातून बदला, प्रतिबदला... श्रीलंकेतल्या  पर्यटन व्यवसायावर आता होणारा परिणाम दूरगामी असणार.  

अभिजित टोणगांवकर


No comments:

Post a Comment