मधले पान


कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

आज ३१ ऑक्टोबर! आज सरदार पटेलांचा जन्मदिवस!!! हाच दिवस मोदी सरकारने एकता दिवस म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. ह्याच दिवसाचे औचित्य साधून आजपासून जम्मू-काश्मीर हे नवे राज्य म्हणून आणि लदाख हा नवा केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तिवात आले आहे. अर्थात सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असणार आहे. योग्यवेळी तिथे निवडणुका घेण्यात येतील.

काल युरोपियन युनियनच्या काही सदस्यांनी काश्मीरला भेट दिली. ह्यावर बरेच वाद सुरु आहेत. पण त्याकडे लक्ष न देता सरकारने त्या सदस्यांची काश्मीर भेट व्यवस्थित आयोजित केली. 

जागतिक राजकारणात ह्या अशा तऱ्हेच्या घटनांना महत्व आहे. आजची पाश्चिमात्य माध्यमे ही काहीशी एकांगी माहिती देताना दिसत आहेत. त्यावर उतारा म्हणून ह्या अशा प्रकारच्या भेटी आयोजित गरज सरकारला वाटली असेल.

नुकत्याच महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुका पार पडल्या. त्यात भाजप ला निर्विवाद बहुमत मिळाले नाही. भारतीय मतदार हा कोणाच्याच दबावाला बळी पडत नाही, तो स्वत:चा विचार करत असतो हेच यातून सिद्ध झाले आहे. 


तरीही एका निरीक्षणानुसार राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणूकीत वंचित बहुजनआणि काँग्रेस-राष्ट्रवादीएकत्र असते तर किमान ३२ जागांवर फरक दिसला असता. या मतदार संघात भाजप-सेनेचाविजयी उमेदवार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभूत उमेदवार यांच्यातील मतांच्या अंतरापेक्षा जास्त किंवा किमान तितकीच मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने मिळवलेली दिसतात. त्याचप्रमाणे अगदी थोड्या मताधिक्याने निवडून आलेल्या ठिकाणी 'नोटा' मुळेही काही मते कमी झालेली दिसतात. 
थोडक्यात 'वंचित बहुजन आघाडी' ही भाजपची 'बी' टीम आहे की काय असे मनात आले. अनेकांनी असे बोलूनही दाखवले होते. असो. तर आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेची धामधूम सुरु होईल. शिवसेना सोबत असल्याने हा समारंभ रंगतदार होणार हे नक्की.

ह्यावर्षी दसरा, दिवाळी पर्यंत पाऊस चालू आहे. पुण्यात तर पावसाने अनेक ठिकाणी कहर केला. पावसाने नुकसान अधिक केले की दिलासा दिला हे सांगता येणार नाही अशा मनस्थितीत लोक आहेत.
सध्या सगळीकडे सावरकरांना भारतरत्न द्यावे ह्या मागणीविषयी माध्यमात उलट-सुलट मते पत्रकार मांडताना दिसत आहेत. ह्या सर्व चर्चांमुळे निदान सावरकरांविषयी अनेक जण जाणून घेत आहेत ही बाब स्वागतार्ह आहे. 
विक्रम संपत सारख्या तरुण लेखकाने त्यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. शेषराव मोरे ह्या अभ्यासू लेखकाने ही 'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' ह्या नावाचे पुस्तक लिहिले आहे. काहीही जाणून न घेता मते बनवण्यावेक्षा नव्या लोकांनी अशी पुस्तके वाचून आपली मते बनवावी अशी आशा आहे.
नुकतेच अमेरिकेने आयसिस प्रमुख असलेल्या बगदादीला मारले असल्याची बातमी दिली. त्यानंतर बोलताना ट्रम्पने स्पष्ट शब्दांत हा सगळा खटाटोप सिरियातील तेलासाठी चालला होता ह्याची स्पष्ट कबुली दिली. आणि ह्या तेल साठ्यात आम्हांलाही वाटा हवा आहे हे सांगितले.
ह्या तेलाच्या युद्धांत किती देश होरपळून निघणार आहेत, किती लोक मारले जाणार आहेत कळत नाही.

काश्मीर प्रश्नी जगात वादळ उठवू असे म्हणणाऱ्या इमरान खान ह्याला आता स्वतःच्या देशातच मोठ्या वादळाला तोंड द्यावे लागणार आहे. आजच पाकिस्तानात इमरान खान सरकारविरोधात आझादी मोर्चा काढला जाणार आहे. असाच एक मोर्चा इमरान खानने ही नवाज शरीफ यांच्या विरोधात काढला होता. पाकिस्तान आर्मीच्या अनुमतीनेच ह्या मोर्च्याचे आयोजन 'जमियत उलेमा ए इस्लाम' चे नेता मौलाना फझलूर रेहमान करत आहेत.

गेल्या महिन्यात अनेक घडामोडी घडल्या. 

मोदी आणि शी जिनपिंग  यांची महाबलीपुरम येथील भेट, अभिजित बॅनर्जी ह्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक, सौरभ गांगुली ह्यांचे BCCI च्या अध्यक्षपदी विराजमान होणे.....इ. ह्या गदारोळात ब्रेक्झिट, Hongkong येथील निदर्शने थोडीशी मागे पडली. मात्र अजूनही BREXIT बद्दल स्पष्टता नाही.
दरम्यान क्षी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षातर्फे आपल्या नागरिकांसाठी कसे आचरण ठेवावे ह्या बद्दल एक नवा जाहीरनामा काढला आहे. त्याबद्दल पुढील वेळी.........


स्नेहा केतकर


No comments:

Post a Comment