गीताई : अध्याय १३ - क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग


 मागील अध्यायात आपण मधुर असा भक्तियोग पाहिला... भक्तियोगाच्या शीतल झुळुकीमुळे आधीच्या विश्वरूप दर्शनाने निर्माण झालेली उष्णता निवल्यासारखी वाटली. विश्वरूप दर्शन योगात एकाच वेळी प्रज्वलित झालेल्या अनेक अग्नीचा दाह होता तर भक्तियोगात चंदनाची शीतलता होती. पण श्रीकृष्णांना अर्जुनाला अजूनही काही सांगायचे आहे. आत्मज्ञानाची ही भागीरथी पुढच्या अध्यायात पहा कशी ओजस्वी होतं जाते.

क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. यात एकूण ३४ श्लोक आहेत.. अतिशय रंजक अध्याय आहे हा!!!!

श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात -

अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते।

जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र-ज्ञ म्हणती तसे ॥ १॥

क्षेत्र-ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे।

क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे ॥ २॥

क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे।

क्षेत्र-ज्ञ तो कसा कोण एक थोड्यांत सांगतो ॥ ३॥


अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि ज्याला ह्या गोष्टीचे ज्ञान असते, त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे शरीरात क्षेत्रज्ञ म्हणजे मीच वसलेला असतो हे तू प्रथम जाणून घे. क्षेत्र-क्षेत्रज्ञ भेदास जाणणे यालाच मी ज्ञान म्हणतो. क्षेत्र कोण, त्यात कुठकुठले विकार असतात, क्षेत्रज्ञ कोण असतोतो कसा असतो ते मी तुला थोडक्यात सांगतो.
श्रीकृष्णांनी शरीराला क्षेत्र का बरं  म्हटलं असेल? पण मला आवडला हा शब्द. आपल्या भौतिक अस्तित्वाची सीमा boundary आपल शरीर असतं  आणि ते एखाद्या मालकीच्या जमिनी सारखंच असतं.. खासगी आणि सीमित. त्या क्षेत्राच्या जवळपास कुणालाही येण्याची परवानगी नसते.. We occupy our own private physical space. 

ऋषींनी भिन्न मंत्रांत गाईले हे परोपरी ।

वर्णिले ब्रह्म-वाक्यांत सप्रमाण सुनिश्चित ॥ ४ ॥

 

या विषयीचे  ज्ञान ऋषींनी अनेक मंत्रांतून गाईले  आहे आणि ब्रम्हवाक्यातही अनेक उदाहरणं देऊन याचे वर्णन केले  आहे. भगवान आता अधिक विस्ताराने सांगू लागतात – 

पंच भूते अहंकार बुद्धि अव्यक्त मूळ जे ।

इंद्रिये अकरा त्यांस खेचिते अर्थ-पंचक ॥ ५ ॥

इच्छा द्वेष सुखे दुःखे धृति संघात चेतना ।

विकार-युक्त हे क्षेत्र थोड्यांत तुज बोलिलो ॥ ६ ॥

नम्रता दंभ-शून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा ।

पावित्र्य गुरू-शुश्रूषा स्थिरता आत्म-संयम ॥ ७ ॥

निरहंकारता चित्ती विषयांत विरक्तता ।

जन्म-मृत्यु-जरा-रोग-दुःख-दोष-विचारणा ॥ ८ ॥

निःसंग-वृत्ति कर्मात पुत्रादींत अलिप्तता ।

प्रिय-अप्रिय लाभांत अखंड सम-चित्तता ॥ ९ ॥

माझ्या ठाई अनन्यत्वे भक्ति निष्काम निश्चळ ।

एकांताविषयी प्रीती जन-संगांत नावड ॥ १० ॥

आत्म-ज्ञानी स्थिर श्रद्धा तत्त्वता ज्ञेय-दर्शन ।

हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे ॥ ११ ॥


पहा हं, अतिशय सोपी रोजच्या जगण्यातली साधी उदाहरणं देऊन श्रीकृष्ण ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय ते समजावतात. श्रीकृष्ण म्हणतात की पंच महाभूतेंअहंकार आणि बुद्धि या प्रकृतीच्या घटकांतून मानवी अस्तित्व निर्माण होतं. आणि त्या अस्तित्वाला  एकूण अकरा इंद्रिय असतात...मला तर पाचच इंद्रिये  माहित होती मग अकरा इंद्रिये  कशी काय? तर पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये अशी एकूण दहा इंद्रिये  असतात.

पाच कर्मेंद्रिये कोणती? हात, पाय, गुदद्वार, मूत्र विसर्जन इंद्रिय आणि जननेंद्रिय. पाच ज्ञानेंद्रिये कोणती? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अशी सगळी एकूण दहा इंद्रिये, ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या जगाचे ज्ञान होते. आणि मग अकरावे  इंद्रिय कोणते? बरोबर ओळखलंत! अकरावे इंद्रिय म्हणजे आपले ‘मन’. हे सगळं जाणणे  म्हणजे ज्ञान....इच्छा, द्वेष, सुख, दुःख, शरीराचा पिंड, त्यातील चेतना, धृति म्हणजेच धारणा हे सर्व क्षेत्रांचे म्हणजे शरीराचे विकार आहेत, त्यांविषयी मी तुला थोडक्यात सांगतो.

ज्ञान म्हणजे नम्रता, दांभिकता नसणे, अहिंसा, क्षमा, ऋजुता, शरीराचे  आणि मनाचे पावित्र्य, गुरूंची सेवा करणे, स्थिरता आणि आत्मसंयम, चित्तात निरहंकारता असणे, विषयांपासून विरक्त असणे, जन्म, मृत्यू, वार्धक्य, रोग, दुःख, दोष यांचा परिणाम न होऊ देणे, कामात निःसंग वृत्ती असणे, मुलाबाळांच्यात न गुंतणे, प्रिय अप्रिय असे  काहीच नसणे, अखंड समचित्त असणे, परमेश्वराठायी अनन्य भक्ती  असणे, ती सुद्धा निष्काम आणि अविचल अशी. एकांत, शांतता आवडणे, जास्त गर्दीची आवड नसणे. अशा प्रकारे आत्मज्ञानी, ज्याची श्रद्धा स्थिर आहे, त्या सगळ्यात ज्ञानाचे दर्शन होते... हे ज़े अर्जुना मी तुला सगळं सांगितलं ते ज्ञान आहे आणि याच्या उलट किंवा विपरीत ज़े काही सगळं आहे ते सगळं अज्ञान आहे. 

ज्ञेय ते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्व चि ।

अनादि जे पर-ब्रह्म आहे नाही न बोलवे ॥ १२ ॥

सर्वत्र दिसती ज्यास हात पाय शिरे मुखे ।

कान डोळे हि सर्वत्र सर्व झाकूनि जे उरे ॥ १३ ॥

असूनि इंद्रियांतीत त्यांचे व्यापार भासवी ।

न स्पर्शता धरी सर्व गुण भोगूनि निर्गुण ॥ १४ ॥

जे एक आंत-बाहेर जे एक चि चराचर ।

असूनि जवळी दूर सूक्ष्मत्वे नेणवे चि जे ॥ १५ ॥

भूत-मात्री न भेदूनि राहिले भेदल्यापरी ।

भूतांस जन्म दे पाळी गिळी जे शेवटी स्वये ॥ १६

जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले ।

ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे ॥ १७ ॥

श्रीकृष्ण, ज्ञान म्हणजे कायअज्ञान म्हणजे कायते सांगून अर्जुनाला अजून खोलवर घेऊन जातात. ते म्हणतात, ऐक... ज्ञेय ते असते ज्याचे  ज्ञान अमृततुल्य असते. हे ज्ञान अनादि परब्रम्ह असून म्हटलं तर ते आहेही आणि म्हटलं तर नाहीही असे  सगुण निर्गुण दोन्हीं रूपांत आहे. असे हे ज्ञेय ज्यास ठाऊक आहे, त्याला सर्वत्र अनेक हात, पाय, डोकी, तोंड दिसतात. नाना रूपात ईश्वर दिसतो आणि त्याला हे ही ठाऊक असते  की या सगळ्यांना व्यापून तरीही उरणारा परमेश्वर असतो.

असा तो ज्ञानी इंद्रियांद्वारे सर्व व्यवहार करूनही इंद्रियांच्या आहारी न जाता अशा प्रकारे जगत असतो जणू स्पर्श न करताही सर्व धरून असावा किंवा सर्व गुण भोगुनही निर्गुण असावा. ज़े आत तेच बाहेर, सर्व चराचरातही तेच भरले आहे, सूक्ष्म असल्यामुळे कळण्यासारखे नाही, जवळ असून दूर असल्यासारखे. सर्व भूतमात्रात, प्रत्येक अस्तित्वात विभागले गेलेले तरीही अविभाज्य, एकसंध, सर्व भूतमात्रांना जन्म देणारे व पुन्हा  त्यांना गिळंकृत करणारे, स्वयंभू अंधारातील गडद अंधार आणि ज्योतींमधील ज्योत असे हे ज्ञान आहे...पुढची ओळ फार सुंदर आहे.

ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्‌ ।

विनोबांच्या काव्य प्रतिभेने लिहिलें "ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे" किती सुंदर! सर्व ज्ञानाचे  ज्ञान त्याला "ज्ञेय' म्हणतात आणि कृष्ण म्हणतात, परमात्मा या "ज्ञेय" रूपाने सर्वांच्या हृदयात वसलेला आहे.

हे सर्व वर्णन लिहिताना मनात रुंजी घालणाऱ्या ह्या ओळी - "दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती"

आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी कठीण कठीण काही कळलं नाही तरी हे कळायला सोपे आहे.

संक्षेपे वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसे चि हे ।

जाणूनि भक्त जो माझा माझे सायुज्य मेळवी ॥ १८ ll

श्रीकृष्ण म्हणतात, अशा प्रकारे मी तुला क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय हे काय असते  ते सांगितले. जो भक्त हे जाणून घेतो, तो सायुज्यता म्हणजेच भक्त आणि परमेश्वर यांच्यातले  द्वैत संपून मुक्ती प्राप्त करतो.

या पुढे श्रीकृष्ण प्रकृती आणि पुरुष या विषयीचे  ज्ञान अर्जुनाला देतात. अर्जुनाबरोबर आपण सारेच या ज्ञानाचे लाभार्थी झालो आहोत.

प्रकृती-पुरूषाची ही जोडी जाण अनादि तू ।

प्रकृतीपासुनी होती विकार गुण सर्व हि ॥ १९ ॥

देहेंद्रियांचे कर्तृत्व बोलिले प्रकृतीकडे ।

दुःखा-सुखाचे भोक्तृत्व बोलिले पुरूषाकडे ॥ २० ॥

बांधिला प्रकृतीने तो तिचे ते गुण भोगितो ।

गुण-संगामुळे ह्यास घेणे जन्म शुभाशुभ ॥ २१ ॥

सर्व-साक्षी अनु-ज्ञाता भर्ता भोक्ता महेश्वर ।

म्हणती परमात्मा हि देही पुरूष तो पर ॥ २२ ॥

पुरूषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक ।

जाणे कसा हि तो राहो न पुन्हा जन्म पावतो ॥ २३॥

प्रकृती आणि पुरुष हे इथे स्त्री आणि पुरुष अशा अर्थाने म्हटलेले नाही. इथे प्रकृती हे पंच महाभूतांनी बनलेलं जीवाचे  भौतिक रूप आणि त्याची बुद्धि, मन, अहंकार यातून बाह्य जगाशी होणारे व्यवहार, त्याची अभिव्यक्ती, expression आहे तर पुरुष हा प्रकृतीला धारण करणारा आत्मा किंवा त्यातील चेतना आहे.

हे अर्जुना, प्रकृती आणि पुरुषाची ही जोडी अनादि आहे हे तू प्रथम जाणून घे. प्रकृतीपासून सर्व विकार आणि गुण म्हणजे बऱ्या-वाईट अभिव्यक्ती उत्पन्न होतात. शरीरातील इंद्रियांचे ज़े व्यवहार होतात ते प्रकृतीच्या गुणातून होतात, पण त्यातून निर्माण होणारी सुख दुःखे  यांची अनुभूति मात्र पुरुष म्हणजे आत्मशक्ती अनुभवत किंवा भोगत असते. प्रकृतीच्या गुणांनी बांधलेला हा पुरुष म्हणजे आत्मा, तिचे बरे-वाईट भोग भोगून त्याप्रमाणे पुढचा बरा वाईट जन्म प्राप्त करतो.

अशा प्रकारे हा पुरुष म्हणजेच देहात वसलेला आत्मा, हा सर्वसाक्षी, द्रष्टा, आणि संमती देणारा असल्याने अनुमंता, सर्वांचे धारण-पोषण करणारा म्हणून भर्ता, जीवरूपाने भोक्ता, सर्वांचा स्वामी सच्चिदानंद परमात्मा म्हटला जातो. अशा प्रकारे पुरुषाचे हे रूप आणि प्रकृतीचे गुणात्मक रूप जो जाणतो, तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही.

ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी ।

सांख्य-योगे तसे कोणी कर्म-योगे हि आणिक ॥२४ ॥

स्वये नेणूनिया कोणी थोरांपासूनि ऐकिती ।

तरती ते हि मृत्यूस श्रद्धेने वर्तुनी तसे ॥ २५ ॥

उत्पन्न होतसे लोकी जे जे स्थावर-जंगम ।

क्षेत्र-क्षेत्रज्ञ-संयोगे घडिले जाण सर्व ते ॥ २६ ॥

 Amazing knowledge! श्रीकृष्ण पुढे म्हणतात, कोणी माणसं ध्यान करून आपल्या अंतरात्म्याला पाहतात, कोणी सांख्य योग किंवा कर्म योग आचरतात. ज्यांना स्वतःला फारसे  कळत नाही, ते मोठया लोकांकडून ऐकून जाणून घेतात अशी लोक सुद्धा केवळ त्यांच्या श्रद्धेमुळे जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून तरून जातात.

अर्जुना! एक लक्षात ठेव ज़े ज़े स्थायी स्थावर जंगम जीव उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातूनच होतात.

समान सर्व भूतांत राहिला परमेश्वर ।

अनाशी नाशवंतांत जो पाहे तो चि पाहतो ॥ २७ ॥

जो पाहे प्रभु सर्वत्र भरला सम तो स्वये ।

आत्म्याची न करी हिंसा गति उत्तम मेळवी ॥ २८ ॥

भगवान म्हणतात सर्व भूतात परमेश्वर आहे..आणि जो नश्वर देहातील अविनाशी आत्मा पाहू शकतो "पाहे तो तो चि पाहतो"  तो नुसताच पाहात नाही तर तोच खऱ्या अर्थाने पाहतो. जो परमेश्वराला सर्वत्र सारखाच भरलेला पाहतो तोच शेवटी उत्तम गती प्राप्त करतो.

प्रकृतीच्या चि तंत्राने कर्मे होतात सर्व हि ।

आत्मा तो न करी काही हे पाहे तो चि पाहतो ॥२९॥

एकत्वी जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण ।

त्यामधूनि चि विस्तार तेंव्हा ब्रह्मत्व लाभले ॥ ३०॥

प्रकृतीच्या कर्मांतून सर्व कर्मे घडत असतात.. आत्मशक्ती स्वतः ती कर्म करत नसते हे जो पाहू शकतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो. सर्व भूतें वेगवेगळी असली तरी त्यात वसलेली आत्म शक्ती एकच आहे आणि एकाच आत्म शक्तीतून अनेक भुतांची निर्मिती होते हे जो जाणतो त्याला ब्रम्हत्व लाभते.

परमात्मा न वेचे चि की निर्गुण अनादि हा ।

राहे देही परी काही न करी न मळे चि तो ॥ ३१ ॥

सर्व व्यापूनि आकाश सूक्ष्मत्वे न मळे जसे ।

सर्वत्र भरला देही आत्मा तो न मळे तसा ॥ ३२ ॥

 

तर हे अर्जुना हा परमात्मा असा निर्गुण आणि अनादि आहे...तो देह धारण करतो पण त्याला चिकटून राहत नाही....सर्व व्यापून उरणार आकाश कणभरही कुठे लिप्त नसतं तसंच सर्व देहांत भरलेला आत्मा, परमेश्वर हा देहात राहूनही अलिप्त, निर्लेप असतो.

एकला चि जसा सूर्य उजळी भुवन-त्रय ।

तसा क्षेत्रज्ञ तो क्षेत्र संपूर्ण उजळीतसे ॥ ३३ ॥

 

हा श्लोक किती सुंदर आहे..संपूर्ण गीता ही अनेक सुंदर उदाहरणांनी, उपमांनी अलंकृत आहे.पहा श्रीकृष्ण काय म्हणतात जसा एकटा सूर्य त्रिभुवन उजळून टाकतो तसा मी परमात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ संपूर्ण क्षेत्र म्हणजे प्रकृतीने धारण केलेल शरीर, जीवात्मा उजळून टाकतो.

पाहती ज्ञान-दृष्टीने क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेद हा ।

भूत-प्रकृति लंघूनि ते ब्रह्म-पद पावती ॥ ३४ ॥

 

श्रीकृष्ण म्हणतात जो कोणी ज्ञान दृष्टी ठेऊन हा क्षेत्र-क्षेत्रज्ञ भेद जाणतात ते पंच महाभूत आणि प्रकृती पासून निर्माण होणारे विषय आणि विकार लंघून ब्रह्मपदास पोहोचतात.

बाप रे! कसं वाटतंय सांगू..... आपण एखाद्या उंच पर्वतावर चढाईला जातो तेव्हा सुरवात करताना अबब किती उंच! आपल्याला जमेल का चढायला असे  वाटते ... शिखर गाठण्याच्या ध्यासाने आपण चढत जातो. अर्ध्यापेक्षा वर चढल्यावर खात्री पटते आपण नक्की तिथं पोहोचू. आपण मागे वळून पाहिलं तर अथांग आकाश दिसते, विस्तीर्ण पसरलेले जग इवलेसे  दिसू लागते. थंड गार वारा सुखावत असतो. विश्वास बसत नाही. खरंच, आपण इतके  चढून वर आलो?... पण शिखर खुणावत असते.. जोश कायम असतो...exactly तसेच वाटतेय मला... keep going Alka!


क्रमश:


अलका देशपांडे





1 comment:

  1. खूप सोप्या भाषेत सांगितले आहे. धन्यवाद!

    ReplyDelete