गीताई : अध्याय ६ - आत्मसंयम योग



मागच्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म आचरून योग कसा साधावा आणि शेवटी ध्यान कसे लावावे ते सांगितले. पण खरंच इतके सोपे असते का हे सगळे? श्रीकृष्णाला त्याची कल्पना आहे, त्यामुळे ते स्वतः या योगात ध्यानातून आत्मसंयम कसा करावा हे फार विस्ताराने सांगतात. तुम्हा-आम्हांला कळेल असे. या अध्यायात एकूण ४२ श्लोक आहेत.

फळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो
तो संन्यासी तसा योगी जो निर्यज्ञ निष्क्रिय


श्रीकृष्ण पहिल्या श्लोकात मागील अध्यायाची आठवण करून देतात, की जो फळाची आशा सोडून कर्तव्य करतो तोच खरा संन्यासी व तोच खरा योगी. केवळ यज्ञाचा त्याग करून किंवा केवळ कर्माचा त्याग करून योगी होता येत नाही.

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी
आत्माची आपला बंधू आत्माची रिपु आपुला
जिंकुनी घेतला आत्मा बंधू तो होय आपुला
सोडीला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये

श्रीकृष्ण एक छान विचार सांगतात- आपली आत्मशक्ती नियंत्रणात ठेवली तर तीच आपला सखा आणि स्वैर सोडली तर तीच आपली शत्रू बनू शकते. आपण अवतीभवती पाहतोच, आत्मशक्तीच्या जोरावर अनेक माणसे थोर कामेही करतात आणि विघातक कामे करणारी माणसेही आजूबाजूला असतात.

तोषला ज्ञान विज्ञाने स्थिर जिंकूनी  इंद्रिये
तो योगी सम देखे सोने पाषाण मृत्तिका
शत्रू, मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा
असो साधू असो पापी सम पाहे विशेषची तो


ज्याने इंद्रियांना जिंकले आहे अशी व्यक्ती ज्ञान विज्ञानात संतुष्ट असते, तिच्या मनात एक प्रकारचा समत्व भाव असतो. तिच्या करिता सोने, माती, शत्रू, मित्र, मध्यस्थ, परका, जवळचा, साधू, पापी असे भेद नसतात. ती सर्वांना सम पाहते. पुढच्या काही श्लोकांत श्रीकृष्णाने आत्मसंयमन कसे करावे ते अगदी step by step सांगितले आहे.

साधके चित्त बांधुनी इच्छा संग्रह सोडूनी
आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपण


आत्म संयमनासाठी ध्यान, meditation जरुरी आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याला अशा प्रकारे ध्यानसाधना करायची असते ते त्यात आपले चित्त बांधून, म्हणजे एकाग्र करून सर्व distractions, इच्छा, मोह यांना दूर करून एकांतात जिथे आवाज, disturbance नाही अशा ठिकाणी जितका जमेल तितका वेळ आत्म्याशी जोड जाण्याचा connect  होण्याचा प्रयत्न करतात. कसे ते पुढे पहा


पवित्र स्थान पाहुनी घालावे स्थिर आसन
दर्भ चर्म वरी वस्त्र घ्यावे ऊंच नीच ते


किती बारकावे सांगितले आहेत पहा कृष्णाने! ज्या ठिकाणी तुम्ही साधना करत असाल तो भाग स्वच्छ, पवित्र असावा. गवत किंवा चर्म, आजच्या काळात म्हणायचे तर yoga mat, चटई अशा प्रकारचे जे उंच-सखल नसेल असे स्थिर आसन बसायला घ्यावे.

चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी
आत्मशुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे


आपण आजच्या जमान्यात पैसे देऊन मेडिटेशन क्लास लावतो, पण श्रीकृष्णाने मेडिटेशन करण्याची कृती आपल्याला त्याकाळातच सांगितलेली आहे. चित्तेंद्रियांचे व्यापार, व्यापार म्हणजे देवाण-घेवाण... इंद्रियांची सतत विषयांची देवाणघेवाण ही चालूच असते. ती बंद करावी आणि आत्मशुद्धीच्या हेतूने मन एकाग्र करायला सुरुवात करावी.


शरीर सम रेखेत राखावे स्थिर निश्चल
दृष्टी ठेवूनी नासाग्री पहावे कुणीकडे


शरीर सरळ ठेऊन, न हालचाल करता नाकाच्या शेंड्याकडे दृष्टी केंद्रित करावी आणि इकडेतिकडे पाहू नये. Such a detailing!

शांत निर्भय मच्चित्त ब्रह्मचर्य व्रती स्थिर
मन रोधुनी युक्तीने राहावे मत्परायण
असे आत्म्यास जोडूनी योगी आवरीला मने
मोक्षास भिडली शांति माझ्या ठाईची मिळवली


अशा प्रकारे शांत निर्भय राहून आत्म्यात म्हणजे परमेश्वरा ठायी चित्त एकाग्र करावे. श्रीकृष्णाची आत्म्यांस जोडणे ही कल्पना मला फार आवडते. आपण नुसते जगत असतो, पण आपण आपल्याच आत्मशक्तीशी एकरूप झालेलो नसतो. आपण सतत बाह्य जगात इंद्रियांमार्फत माहिती ग्रहण करत असतो आणि सतत व्यक्त होत असतो. We are busy grasping, consuming, expressing, acting and reacting. आपल्या आत्मशक्तीशी आपण कितीवेळा एकरूप होतो? श्रीकृष्ण अशा ध्यान धारणेतून आपल्याला स्वतःच्याच आत्मशक्तीशी जोडून घ्यायला सांगतात. श्रीकृष्ण म्हणतात जो अशा प्रकारे स्वतः ला आत्मशक्तीशी जोडून घेतो तो मोक्ष आणि शांति प्राप्त करतो. पुढे श्रीकृष्णांनी फार मजेदार श्लोक सांगितले आहेत.

योग फार खाऊनी किंवा खाणेची सोडूनी
फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी
निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्यही
मोजुनि करितो त्यास योग हा दुःख नाशन


हे जे वरचे दोन श्लोक आहेत ते प्रत्येक घरात आणि ऑफीसमध्ये लावले पाहिजेत. आजकाल आपण आजूबाजूला जे पाहतो तेच श्रीकृष्णांनी सांगितले आहे की खूप खादाडासारखे खाणाऱ्याला, किंवा उपास तापास करून जीव मारणाऱ्याला किंवा खूप झोपा काढणाऱ्या आळश्याला किंवा उगीच जागत बसणाऱ्याला योग साधत नाही. जो खाणे, फिरणे, झोपणे, जागणे इतकेच काय तर रोजची कामेसुद्धा मोजून, म्हणजे प्रमाणामध्ये करतो त्याला योग साध्य होतो आणि त्याच्या दुःखांचा नाश होतो. श्रीकृष्ण खरंच द्रष्टे होते. त्यांना माणसाच्या या दुर्गुणांची पूर्ण कल्पना होती.

निर्वाती ठेविला दीप तेवतो एकसारखा
तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती


जिथे वारा वहात नाही अशा ठिकाणी ठेवलेला दिवा जसा स्थिरपणे तेवतच राहतो तसे जेव्हा आपली आपल्या आत्मशक्तीशी भेट होते तेव्हा आपण अंतरातून तुष्ट होतो आणि आपल्या अस्तित्वाला स्थिरता येते.

जया लाभामुळे लाभ दुसरा तुच्छ लेखितो
चळे जेथ राहुनि दुःख भारही दाटला

अशा योगाचरणातून मिळालेली शांती सुखाच्या लाभापुढे इतर सर्व लाभ तुच्छ वाटू लागतात अशी व्यक्ती कितीही दुःखाला सामोरे जावे लागले तरी स्थिरचित्तच राहते. पुढे श्रीकृष्ण म्हणतात-

फुटेल जेथे-जेथूनि मन चंचल अस्थिर
तेथ तेथुनी बांधूनी लावावे आत्मचिंतनी

अस्थिर, चंचल मन जिथून तिथून फुटून पळू पाहिले त्याला बांधून ठेऊन आत्म चिंतनाच्या मार्गी लावावे. पुढचे दोन श्लोक छान आहेत -

भुतांत भरला आत्मा भूतें आत्म्यांत राहती
योगाने जोडीला देखे हेची सर्वत्र दर्शन
मज सर्वात जो पाहे, पाहे माझ्यात सर्वही
त्याचा मी आणि तो माझा एकमेकांस अक्षय

Simply beautiful! श्रीकृष्ण म्हणतात, प्राणिमात्रांत आत्मशक्ती आहे आणि आत्मशक्तीमध्ये लीन असे प्राणिमात्र आहेत. जी व्यक्ती योग आचरून आत्मशक्तीशी स्वतःला जोडते तिला सर्वत्र आत्मशक्तीच दिसते. जो सर्व सृष्टीत, चराचरात मला (परमेश्वराला ) पाहतो आणि ज्याला माझ्यात सर्व सृष्टी सामावलेली दिसते, तो माझा बनतो आणि मी त्याचा बनतो. आम्ही एकमेकांसाठी "अक्षय " असतो, म्हणजे आम्ही कधीही एकमेकांना अंतर देत नाही. परमेश्वराशी अशा प्रकारचे  नाते जोडण्याची ही कल्पना फार फार सुंदर आहे. परमेश्वर म्हणजे कुणी मानवी आकारधारी व्यक्ती नसून ती आत्मशक्ती आहे. तिच्याशी सतत जोडलेले असणे, तद्रूप होणे हे योग, ध्यान करून साध्य करता येण्यासारखे आहे असे भगवान म्हणतात.

स्थिर होऊनि एकत्वि सर्व भूती भजे मज
राहो कसाही तो योगी माझ्यामध्येची राहतो

जो सर्व प्राणिमात्रांत मला पाहतो असा स्थिर योगी कसाही असला तरी तो माझ्यात सामावलेला असतो. या नंतर बऱ्याच वेळाने अर्जुनाला प्रश्न सुचतो-

तू बोललास जो आता साम्य योग जनार्दना
देखे स्थिरता त्यांची ह्या चंचळ मनापुढे
मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळीतसे बळे
धावे वाऱ्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर

माझी खात्री आहे, या श्लोकपर्यंत येण्याआधी तुमच्या मनातही हा प्रश्न आला असणार. आपलेच प्रश्न तो कृष्णाला विचारत आहे. कृष्णा, तू जरी हा साम्य योग सांगितला असलास तरी या चंचल मनापुढे मला तरी अशी स्थिरता येल असे  वाटत नाही. वाऱ्यासारखे धावणाऱ्या हट्टी मनाला तू आवरायला सांगतोस? भगवान उत्तर देतात-

अवश्य मन दुःसाध्य म्हणतो तसेची ते
परी अभ्यास वैराग्य त्याचा निग्रह होतसे


नक्कीच... तू म्हणतोस तसेच हे मन आवरणे सोपे नाहीये परंतु अभ्यासाने, प्रयत्नाने हे जमू शकते. सांगा कुठली गोष्ट सरावाशिवाय सहज अवगत होते? खेळ, संगीत, शिक्षण सगळीकडे अभ्यास, सराव, प्रयत्नांची गरज असते. अशा प्रकारे आत्म संयमनासाठीही ध्यानाची सवय करायला हवी.

संयमाविण हा योग साधे मानितोची मी
परी संयमवंतास उपाये साध्य होतसे


श्रीकृष्ण म्हणतात, मी मान्य करतो की संयमाशिवाय हा योग साध्य होणार नाही पण जो संयम बाळगू शकतो, त्याला हा योग निश्चितच साध्य होतो. अर्जुनाने आता एक फारच चमत्कारिक प्रश्न विचारला. तो 'जर... तर...च्या चक्रात अडकलेल्या आपल्यासारख्या पामरांनी विचारावा असा प्रश्न होता.

श्रद्धा आहे नव्हे यत्न योगांतुनि चळूनि जो
मुकला योग सिद्धीस जाय कोण्या गतीस तो?
काय तो उभय भ्रष्ट ब्रम्ह मार्गी भुलुनिया
नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी?
माझा संशय हा कृष्णा तूची फेडी मुळांतूनी
फेडिलसा दुजा कोणी दिसेचि तुझ्याविण


अर्जुनाला वेगळीच भीती वाटते- समजा मी हा प्रयत्न अर्ध्यावर सोडला तर? जो हा योग आचारताना विचलित झाला त्याचे पुढे काय होते? फुटलेल्या ढगाप्रमाणे पथभ्रष्ट होऊन तो नाश पावतो का? कृष्णा माझा हा संशय तुझ्या शिवाय दुसरे कोणी ही दूर करू शकणार नाही. भगवान म्हणतात-

ह्या लोकी त्या लोकी नाश तो पावतो
कधी शुभकारी कुणी बापा दुर्गतीस जातसे
पुण्य लोकांत राहुनि तो योग-भ्रष्ट संतत
शुचि साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे

भगवान म्हणतात, योगसाधना करणारी व्यक्ती जरी योग साधनेपासून विचलित झाली तरी ती दुर्गतीस जात नाही. पुढे चांगल्या घरात तिचा जन्म होऊन ती व्यक्ती आपली साधना पुढे चालू ठेऊ शकते.

योगी तत्पर राहुनि दोष जाळीत जाळीत
अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो


इथे भगवान योग साधनेला एका जन्माची नव्हे, जन्मोजन्मीची साधना म्हणतात. प्रत्येक जन्मात योग आपले दोष जाळीत म्हणजे आपल्याला दोषरहित करत मोक्ष मिळवून देतो. श्रीकृष्ण शेवटी conclude करतात-

योगी तत्पर राहुनि दोष जाळीत जाळीत
अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो



शेवटी योग आचारताना, आत्मसंयमन करताना परमेश्वराठायी श्रद्धा ठेवणे, परमेश्वरात आपला जीव ठेवणे, त्याला जीव लावणे फार महत्त्वाचे आहे. कारण शेवटी तो परमेश्वर आणि आपली आत्मशक्ती वेगळे नाहीत. आपण त्याचेच मानवी रूपातील प्रकटीकरण आहोत. योग हा आपल्याला आत्मशक्तीशी, परमेश्वराशी जोडण्याची प्रक्रिया आहे.
Thank you Shrikrushna, We love you!

अलका देशपांडे








3 comments:

  1. सहज आणि सोपे विवेचन.

    ReplyDelete
  2. Neena VaishampayanJuly 3, 2020 at 10:57 PM

    खूप छान सोप्या शब्दात अर्थ सांगितला आहे. ��

    ReplyDelete