महानगराची कहाणी - २



आता एकविसाव्या शतकातील मुंबई बुलेट ट्रेनच्या स्वागताची जय्यत तय्यारी करत आहे. शरीरातील रक्तवाहिन्यान सारखेच मुंबईच्या पोटातून आता मेट्रोचे जाळे चौफेर पसरू लागले आहे. मुंबईच्या अवकाशात स्कायट्रेन ही दिसू लागली आहे. दळणवळणातील ही महाक्रांती आज आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी अनुभवत आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक प्रमूख शहर या महानगरीशी हवाईमार्गाने जोडले असून, आज जगातील पाच प्रमुख विमानतळांपैकी  मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ गणले जात आहे.

वाहतूकीबरोबरच वेगवान संपर्क साधनात सुद्धा आता क्रांती झाल्याने मुंबईचा आता पुन्हा नवा पुनर्जन्म झाला आहे. जुनी मुंबई लुप्त झाली आहे. एकेकाळी छोट्या छोट्या शिडाच्या गलबतांनी गजबजलेल्या, मुंबईच्या अरबी सामुद्रधुनीतील छोटे मोठे धक्के आता नष्ट झाले आहेत.
आता तेथे महाकाय विक्राळ बोटींमधून हजारो कंटेनरातून तेथील अत्याधुनिक यंत्रणेद्वारा भव्य बंदरामधून रोज लाखो टन मालाची चढउतार होत असते. मुंबापुरीच्या किनाऱ्यावर आता अनेक अत्याधुनिक सप्त तारांकित बहूमजली प्रवासी विराट क्रुझ समुद्रावर राज्य करू लागल्या आहेत. मुंबई बंदर आता जलमार्गांने प्रचंड व्यापारी व प्रवासी वाहतूक करणारे जगातील अग्रगण्य बंदर मानले गेले आहे...२३० वर्षांपूर्वी ईस्ट ईंडीया कंपनीच्या जेरॅाल्ड ऑन्जीओने मुंबई बंदरांचा पाया घातला आणि हा भाऊचा धक्का आज जगातील पाच मोठ्या बंदरापैकी एक मुख्य बंदर म्हणून आकाराला आला आहे , स्वात्ंत्र्यापूर्वी मुंबई ते कराची हा मार्ग सगळ्यात वर्दळीचा गणला जात असे, व तिथून रोज हजारो प्रवासी व मालवाहक बोटी ये-जा करत असत

मुंबई बेटांचे एकात्मीकरण करण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो मुंबईच्या उपनगरी रेल्वे म्हणजेच लोकलचा. १८४८ साली तत्कालीन मुंबई सरकारचे मुख्य अभियंता फ्रॅंक जे क्लार्क यांनी कुर्ला ते ठाणे असा रेल्वेचा पहिला प्रस्ताव मांडला. या व्यवस्थेला बोम्बाय ग्रॅंट ईस्टर्न रेल्वे, असे नाव देण्यात आले. यानुसार या मार्गावर परस्पर दिशेने घोड्याने ओढणारे डबे जोडण्यात येणार होते. मग घोड्यांऐवजी लोकोमोटीव्ह इंजिनाची शिफारस करण्यात आली. १८४५ १८५२ मध्ये इंग्लंडमध्ये ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे (सध्याची मध्यरेल्वे ) आणि बोम्बाय बरोडा सेंट्रल इंडिया   (सध्याची पश्चिम ) या कंपन्या मुंबईतील उपनगरी वाहतुकीसाठी स्थापल्या गेल्या आणि १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली व एका नव्या इतिहासाची सुरूवात झाली.

भारतातील आजच्या जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्याचा पाया घातला गेला. टप्प्याटप्प्याने मग रेल्वेमार्गांचा विस्तार होऊ लागला. माहीम व वसईखाडीवर पूल बांधल्यावर बी बी सी आय ने जी आय पी ची माहीम शाखा आपल्याकडे घेऊन १८८४ मध्ये गुजरातच्या दिशेने बलसाडपर्यंत रेल्वेचा विस्तार केला. सध्याच्या मरीनलाईन्जवळ तेव्हा बॅकबे स्टेशन होते तेथून विरारपर्यंत लोकल्स धावू लागल्या. नंतर तर थेट कुलाब्याच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत त्या धावत होत्या. पण जी आय पी रेल्वे कंपनीने १८७३ साली बोरीबंदरला नवीन देखण्या व्हिक्टोरिया टर्मिनल बांधून तिथून रेल्वेसेवा सुरू केली. १९१७ मध्ये प्रवाशीसंख्या वेगाने वाढल्यामूळे व्हीटी ते कल्याण मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले.

वाफेच्या इंजिनांची मर्यादित क्षमता व मुंबईची अमर्याद वाढ व शहराचा वेगाने होणारा विस्तार,
यामुळे अधिक गतिशील व जादा क्षमतेसाठी रेल्वेचे विद्युतीकरण करण्यास १९१९ मध्ये प्रारंभ झाला. जी आय पी रेल्वेमार्गावर १५०० व्होल्टची खास ट्रक्शनलाईन उभारण्यात आली व पुढे सगळेच मार्ग हळूहळू चौपदरी व विद्युत करण्यात आले. मुंबईचा आकार निमुळता व लांबलचक असल्याने उपनगरांना जोडणारी लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी बनली आहे. आज रेल्वेच्या डब्यांच्या रचनेपासून रंगांपर्यंत, अत्यंत आरामदायक वातानुकुलीत प्रशस्त आणि वेगवान रेल्वेची रूळावरील धडधड हीच मुंबईच्या जगण्याची स्पंदने आहेत हे मात्र नक्की.



युवराज शहा


1 comment:

  1. आता यापुढे नियमित लिहित रहा.

    ReplyDelete