महानगराची जन्मकहाणी




आज मुंबईकडे पहिले असता, मुंबईच्या काशात झेपावण्याच्या तयारीत असणारे हज़ारो सिमेंटचे अग्निबाण आजूबाजूला सलगी करून उभे आहेत असे वाटते. इतके विविध, क्रांतिकारक स्थावरात्मक बदल या शहराने गेल्या शतकभर पचविले आहेत की थक्क व्हायला होते.

इंग्रजांच्या कब्जात हा भूखंड येण्यापूर्वी या मुंबई नावाच्या 'गावात' ग्रामसंस्था अस्तित्वात होती. त्या काळात या ग्रामसंस्थेत ही गावची कारभारी मंडळी असत.. आणि पाटील हाच पोलीस व दंडाधिकारी असे. तर अशा या मुंबई बेटाचा पहिला पोलीसपाटील कावसजी पटेल नावाचा एक पारशी माणूस होता. आजही फ़ोर्ट भागात त्याचा एक पुतळा व त्याच्या नावाचा एक रस्ता ह्या इतिहासाची साक्ष देत असतो.

खरे म्हणजे दक्षिणेकडचे एक बेट एवढेच मुंबई नावाचे गाव, हीच ती जुनी मुंबई;
जशी जशी जमिनीची गरज वाढू लागली तसतसे इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी हे गाव इतर बेटांशी पुढे हळू हळू जोडायला सुरुवात केली व ही सात बेटे एकरूप होऊन आजचे शहर आकाराला आले. त्यातूनच मुंबईतलोकल सेल्फ़ गव्हर्नमेंट ( स्थानिक स्वराज्य संस्था)” या संकल्पनेचा जन्म झाला.

१६६१ साली पोर्तुगालची राजकन्या कॅथरॉईन ऑफ़ ब्रागांझा या वेडसर मुलीचे लग्न इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्याबरोबर झाले. त्या वेळी मुंबई बेट तिला विवाहात आंदण म्हणून देण्यात आले. त्या वेळी हे बेट नापीक आणि दलदलीचे होते. मात्र या बेटाचे भविष्यातील महत्त्व पोर्तुगालचा व्हॉईसरॉय मनातून जाणून होता म्हणून तो हे बेट द्यायला टाळत होता. यावरून इंग्लंड व पोर्तुगाल यांच्यात तणाव निर्माण होऊन त्यांच्यातील तहनामा मोडण्याची वेळ आली. व्हॉईसरॉयने आपला पोर्तुगीज राजा आल्फान्झो याला, हे बेट ब्रिटिशांना देऊ नये असा सल्ला दिला; पण आपल्या जावयाच्या दबावापुढे अखेर राजा झुकला व १० ऑगस्ट १६६३ रोज़ी आल्फान्झोने आपल्या व्हॉईसरॉयला सांगून हे बेट इंग्लंडला दिले. त्या वेळी राजाला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, की केवळ तुमच्या हुकुमाचा ताबेदार म्हणून हा आदेश मी मानतो. पण यामुळे भविष्यात आपल्याला पश्तात्ताप होईल व मुंबईहून ब्रिटीशांचे राज्य सुरू होईल; आणि पुढे तेच घडले. भारतात ब्रिटीशांचे साम्राज्य पसरू लागले. हा जो पोर्तुगीज राजा आल्फान्झो आहे, त्यानेच हापूस आंबा आपल्या बरोबर भारतात आणला आणि म्हणूनच त्याला आल्फान्सो या नावाने ओळखला जातो असा उल्लेख आढळतो.

इंग्रंजानी मुंबई जेव्हा ताब्यात घेतली तेव्हा ३ मार्च १६६५ मध्ये गव्हर्नर हम्पर कूक याने एका पत्रात लिहून ठेवले आहे कीइथे ना सरकार होते, ना न्याय, नाही कोणी लॉर्ड मेयर... नव्हती कूठली म्युनिसिपालटी. माझ्या स्वागतालाही कोणीच आले नव्हते...’ या पत्रातच त्याने मुंबईचा उल्लेखबोम्बाईम’ ( BOMBAIM)असा केलेला आहे. पुढे इंग्रजांनी त्याचाबाम्बॉय’ ( BOMBAY) असा अपभ्रंश केला आणि या बॉम्बेचे पुढे शतकानंतरआमची मुंबई : मराठी मुंबईझाले.

मुंबई बेट जेव्हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली आले तेव्हा इथे पोर्तुगिजांच्या धर्मांतराच्या तडाख्यातून वाचलेली काही कोळी हिंदू कुटुंबे, आणि काही शुद्ध व काही संकरीत पोर्तुगिज कुटुंबेच रहात होती. काही मिशनरी होते. बाकी बहुतेक सर्व ब्रिटिश सरकारी नोकरांच्या चाळी होत्या. १६७१ साली कंपनी सरकारच्या वतीने सूरतच्या बनिया लोकांना व्यापारवृद्धीसाठी विशेष सवलती देऊन खास बोलावले गेले. या नंतर दिव बनिया आले. बनियांच्या महाजन समितीने आमच्यावर ख्रिश्चन धर्माची सक्ती लादू नये, आणि कोणताही उपद्रव होता कामा नये अशा मागण्या केल्या व कंपनीने त्या मान्य केल्या. त्यामुळे मुंबईत अन्य जातीजमातींचे लोक यायला सुरुवात झाली, नंतर आर्मेनियन्स आले. तर नडियाद भागातील बहुतेक गुजराथी भाषिक पारशी, इराणी, बोहरी ही मुंबईच्या दिशेने यायला लागले.

मुंबईचा पहिला गव्हर्नर कूक याने सरकारी पैशाचा गैरवापर केल्याने त्याच्या ऐवजी लुकास यांची नेमणूक झाली. १६६९ मध्ये हे बेट दरसाल १० पौंडाचे सोने या भाडेतत्वावर ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आले. नंतर जेरॉल्ड आँजिओची कंपनीच्या अध्यक्षपदी निवड झाली. हाच तो आँजिओ जो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होता. त्याच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीचा व्याप भारतासह पर्शिया, इराण, अरबस्तान असा वाढला होता. कंपनीचे मुख्य ऑफीस सूरतला होते ते त्याने मुंबईला आणले, आणि मुंबई बेटाचा विकास आराखडा तयार केला. कसबी कारागीर, शेतकरी, माळी, विणकर, जहाजे व घर बांधकाम कारागीर, धातू कारागीर, लोहार, चांभार, सोनार, शिंपी, न्हावी, खाटीक, हत्यारे-अवजारे बनविणारे, कापड रंगविणारे रंगारी, आचारी यांना मोठ्या प्रमाणात मुंबईला येण्यास प्रोत्साहन दिले. अशा प्रकारे सर्व कसबी कारागीर, बलुतेदार यांची मुंबईत गर्दी होऊ लागली आणि हे गाव हळू हळू वाढू लागले.

आँजीओनेच न्याय व्यवस्थेचा पाया घातला. त्यानेफेअर कॉमन हाउसही इमारत बांधून तिच्यात न्यायाधीशांसाठी दालने, गुन्हेगारांसाठी तुरूंग, धान्याची कोठारे इत्यादींची सोय केली. हीच इमारत पुढे मापला कोर्ट नावाने ओळखली जात असे. आजही ही इमारत लायन गेटसमोर असून तिथे आँजिओचा शिलालेख पहायला मिळतो. आता तिथे व्यावसायिक लोकांची कार्यालये आहेत.

मुंबईतील वाहतूक क्रांती

मुंबई ब्रिटीशांकडे येण्यापूर्वी १५३४ ते १६६५ या काळात तिथे पोर्तुगिजांचे राज्य होते. त्या काळात चाकावर चालणारी वाहने अशक्यच होती. ज्या मुंबईत आज स्काय ट्रेन धावताना दिसतात, त्या मुंबईत त्या काळातपालखी हेच दळणवळणाचे साधन होते.

मुंबईची गावठाणे ही सात बेटांत विभागली असल्याने मध्ये फक्त खाड्या होत्या. त्यामुळे या गावठाणांमध्ये गलबते, होड्या, जहाजे, हेच संपर्क माध्यम होते, खाड्यांवर उतरून लोक पालखीने इच्छित स्थळी जात असत. ब्रिटीशांनी भराव घालून हळू हळू ही बेटे जोडली आणि दळणवळणातही बदल सुरू झाले. बैलगाड्या, खेचरगाड्या, घोडागाड्या यांचा वापर सुरू झाला. यातही वेगवेगळे आकार-प्रकार असत. रेकला हे वाहन त्या काळी जास्त प्रचलीत होते.

श्रीमंत लोक चार चाकांच्या बग्ग्या वापरू लागले, ब्रिटिश उच्चाधिकारी, कंपनीचे वरच्या हुद्यावरचे लोक, राजघराण्याशी संबंधित व्यक्ती या बग्ग्या किंवा व्हिक्टोरिया यांचा सर्रास वापर करत असत. पुढे इंग्लंडमधील ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे कंपनीने भायखळा ते ठाणे हा रेलमार्ग सुरू केला.

या भूखंडावरील वाहतुकीच्या क्रांतीची ती सुरुवात होती. वाहतूक व्यवस्था आणि दळणवळणामुळे या बेटांवर प्रचंड संख्येने माणसे येऊ लागली. इंग्लंडमधून, अरबस्तानातून घोड्यांनी भरलेली जहाजे मोठ्या प्रमाणावर येऊ लागली, रेल्वे कमी पडू लागल्यावर रुळावरून चालणाऱ्या गाड्या या बेटांवर धावू लागल्या; त्या घोड्यांनी ओढल्या जात. १८७४ पर्यंत तर त्या लहान सहान गल्ल्यांमधूनही धावू लागल्या. पश्चिमेला सौराष्ट्राच्या दिशेने बी.बी.सी.आय. या कंपनीने रेलमार्ग टाकायला सुरुवात केली व पुढे अहमदाबाद जोडले गेले. त्यामुळे मुंबई बेटांवर एतद्देशीय पारशी, गुजराथी, बोहरी, खोजा, मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. त्या नंतर आणखी एक नवी रेलकंपनी आली. जी.आय.पी. या कंपनीने मुंबई आणि पुणे रेलमार्गाने जोडले. आणि मुंबईने देशातील मोठे महानगर म्हणून आकार घ्यायला सुरूवात केली. ट्राम गाड्यांसाठी हजारावर घोडे भायखळा व कुलाबा येथील तबेल्यांमध्ये ठेवलले असत. १९०७ साली मुंबईत पहिली विजेवर
चालणारी ट्राम सुरू होईपर्यंत मुंबईच्या रस्त्यावर जागोजागी खास घोड्याची लीद गोळा करण्यासाठी माणसे नेमली जायची.

सर जमशेटजी टाटांच्या मेहेरबानीमुळे मुंबईत वीजपुरवठा सुरू झाला. खंडाळा घाटाच्या वर अनेक धरणे बांधून त्यांनी वीज निर्मिती केली आणि मुंबईला वीज पुरविण्याचा पहिला मान त्यांना मिळाला. हळू हळू मुंबईत मोटारींचे आगमन झाले. स्पोकचे टायर असलेल्या मोटारी, जहाजांमधून रोज मुंबई बंदरावर उतरवल्या जात असत, त्या पहाण्यासाठी त्या वेळी बघ्यांची मोठी गर्दी होत असे. घोडागाडी व बग्ग्यांऐवजी, उघड्या गाड्यांमधून पारशी कुटुंबे, ब्रिटिश लोक मुंबईच्या रस्यांवरून जाताना अधून मधून दिसू लागली.

पहिल्या महायुद्धानंतर तर मुंबईत मोठ्या प्रमाणावर मोटारींचे आगमन झाले; वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या आकारांच्या मोटारी मुंबईच्या रस्त्यांवर पळू लागल्या. घोडागाड्या हळूहळू नामशेष होऊ लागल्या. फक्त व्यापारी पेठांमध्येच माल वाहतुकीसाठी त्या वापरल्या जाऊ लागल्या. नंतर मुंबईत उघड्या बसेस आल्या, लोक बसेस आणि ट्राममधून सहज प्रवास करू लागले, पण मुंबईच्या पावसामुळे बंदिस्त बसेस यायला सुरुवात झाली. तेव्हापासूनच या लाल रंगाच्या होत्या. बसेसची रचना मागच्या बाजूला लाकडी घरासारखी असायची व पुढे मालट्रकसारखी. हँडल मारून त्या स्टार्ट केल्या जायच्या आणि रॉकेलवर चालायच्या.

मुंबईच्या इतिहासाच्या खुणा असलेले ट्रामचे रूळ बरेच वर्षे मुबंईत दिसायचे. ७० च्या दशकात ट्राम पूर्णपणे बंद झाल्या आणि त्याची जागा दुमजली बसेसने घेतली. हीच डबल डेकर नंतर मुंबईची ओळख बनली. त्या काळच्या बहुतेक सिनेमांमधून मुंबई दाखवण्यासाठी व्ही.टी. स्टेशन आणि डबल डेकर हमखास दाखविली जायची.  
(क्रमश:)
युवराज शहा 










1 comment:

  1. Looking forward to the next part. Flowing language keeps our attention fixed on the topic.

    ReplyDelete