मन करारे प्रसन्न

काही दिवसांपूर्वी एका सिनेअभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी आली होती. चार-पाच दिवस सगळ्या वृत्त वाहिन्यांवर त्याचेच फोटो झळकत होते. शरीराने एकदम धडधाकट आणि नावाला शोभेल असा पंजाबी मुंडा आत्महत्या करेल, यावर कोणी विश्वासच ठेवू शकत नव्हते. त्याच्या एका फोटो मध्ये त्याच्या ओठांवर अलगद हसू होतं, पण ते हसू त्याच्या डोळ्यांमध्ये उतरत नव्हतं, कारण मनावर प्रचंड दडपण घेऊन जगत होता तो. फेसबुक, इन्स्टा वर लाखो चाहते , मित्रमैत्रिणींचा मोठ्ठा circle असूनही मन मोकळं करायला जवळचं असं कोणीच नव्हतं त्याच्यासोबत.
ही बाब फक्त त्यालाच नव्हे, तर आपल्या सगळ्यांना लागू होते. वयाच्या एका टप्प्यानंतर मनाचा एक कप्पा आपण फक्त आपल्यापुरता मर्यादित ठेवतो. कॉलेजमध्ये जिगरी दोस्तांना आपण सगळं काही सांगतो. पण कालांतराने आपण फक्त आपली 'so called perfect life' मित्रांना दाखवतो. आपण मित्रांना आपली एखादी भीती,आपला एखादा प्रश्न सांगितला आणि त्याने आपल्याला समजून घेतले नाही तर!..... या भीतीने आपण आपले problems आपल्यापर्यंतच ठेवतो. इतकेच काय, तर जन्माच्या जोडीदारासोबतही आपण हे problems share करत नाही. 'तो समजून घेणार नाही' किंवा ' तिला यातलं काय कळतं' हे म्हणत मनातल्या मनात कुढत बसतो.
मित्रमैत्रिणी, नातेवाईक, जोडीदार यांच्यासोबत आपण आपलं मन मोकळं करत नाही मग अशा वेळी आपणच आपली मदत करायला हवी. जशी दररोज घरातली साफ सफाई करतो तशी मनातली जळमटं ही वेळोवेळी साफ करणं गरजेचं असतं. साठलेल्या पाण्याला वाट करून दिली की त्यात साठलेली घाण वाहून जाते, तसेच मनात साठलेले विचार व्यक्त केले की मन देखील हलकं होतं. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणाचं ऐकून घ्यायला कोणाकडे वेळच नाही.
दैनंदिन आयुष्यात बरेच लोक भेटतात, जे म्हणतात 'मी खूप positive आहे ' आणि हेच लोक छोटछोट्या गोष्टीवरून चिडचिड करताना आढळतात. मनासारखं घडतं म्हणून सकारात्मक आहे हे म्हणणं चुकीचं आहे. मनाविरुद्ध घडत असताना देखील सकारात्मकता दाखवणं हे positive  असण्याचं लक्षण आहे. अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितीत सकारात्मकता बाळगणे खूप गरजेचे आहे. ही सकारात्मकता एका दिवसात शिकता येत नाही, त्या साठी दररोज सराव करावा लागतो. मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो दररोज नवनवीन गोष्टी शिकत असतो आणि आत्मसात करत असतो. मग ही मनाची सकारात्मकता शिकायची कशी?
आयुर्वेदानुसार गर्भात तिसऱ्या महिन्यात मनाची उत्पत्ती होते चौथ्या महिन्यात चेतना उत्पन्न होते. याचाच अर्थ गर्भाच्या मनाची सकारात्मकता मातेच्या सकारात्मकतेवरही अवलंबून असते. माता काय, आणि कसा विचार करते हे गर्भावर निश्चित परिणाम घडवून आणते. मातेचा सात्विक आहार गर्भाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीला खतपाणी देत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म.
तसेच आयुर्वेद मनाचे स्थान सांगताना 'उरस्थ मन' अर्थात हृदय 'शिरस्थ मन' अर्थात मेंदू अशी दोन स्थाने सांगतो. म्हणजेच एखादी कृती करताना हृदय आणि मेंदू चा समन्वय असणे गरजेचे असते. म्हणून हृदयाला आणि मेंदूला असे प्रशिक्षित करा की ते प्रत्येक परिस्थितीत चांगल्या बाबींचा विचार करतील. उदाहरणच द्यायचे झाले तर - traffic jam किंवा 'वाहतुकीचा खोळंबा' हा शब्द वाचल्याबरोबर आपल्यापैकी कित्येक जणांच्या कपाळावर आठ्या पडतात. कर्णकर्कश्य भोंगे, पेट्रोलची नासाडी, ऑफिसला उशीर अशा अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. आपण आपल्याला मेंदूमध्ये ट्रॅफिकचे हे चित्र गोंदवून ठेवलं आहे. पण ही रहदारी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर, गाडीत सोबतीने जाणे, रहदारीच्या नियमांचे पालन हे जर आपण केले तर रहदारी कमी होईलच पण त्या सोबत हा शब्द ऐकल्यावर मेंदूत निर्माण होणारा विचारांचा ताण ही कमी होईल.
असाच एक शब्द आहे हॉस्पिटल. हॉस्पिटल म्हटले की कित्येकांना धडकीच भरते कारण काही नकारात्मक माहिती आपण मेंदूमध्ये साठवून ठेवलेली असते. पण याच हॉस्पिटलमध्ये नवीन जीव जन्म घेतो, एखाद्याला पुनर्जीवन मिळते, आजारी पडलेली व्यक्ती ठणठणीत बरी होऊन बाहेर पडते, हे आपण विसरून जातो. हृदयाला राग-लोभ-ईर्ष्या-भय- या भावनांपेक्षा प्रेम-माणुसकी-आपुलकी-सन्मान-जवळीक-आकर्षण-आनंद या भावनांची जास्त जाणीव करून दिलीत, की हृदय मेंदूलाही नक्की हे समजावून सांगेल.

मग या valentine day ला मेंदू-हृदय-मनासाठी एक positive thinking day सुद्धा साजरा करूया.
डॉ. स्वप्नाली अनिल धंदर


9 comments:

  1. Nice article and so relevant to today's world.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Very well said!! This is very true that we need to train our brain to accept failures and be positive even in unexpected circumstances. I have seen many educated people too losing their cool when something goes wrong or does not work as per their expectations!!

    ReplyDelete
  4. To the point article, very true for today’s era

    ReplyDelete
  5. खूप सुंदर कल्पना आणि विचार मांडले आहेत. आजच्या युगात खरच या गोष्टींचा नीट विचार करायला हवा.

    ReplyDelete