नामसंकीर्तन-संत सखुबाई



सखु देवासी हाका मारी। सखु देवासी हाका मारी॥
चंद्रभागेतीरी स्नान करोनी। पुंडलिका शेजारी॥
शालू भिजला शेला भिजला। भिजली चोळी जरतारी॥
कीर्तनरंगी नाचू लागली। नामदेवा शेजारी॥
ऐसी सखुची हाक ऐकुनी। देव आले बाहेरी॥

संत सखुबाई ह्यांच्या काव्यरचना किंवा अभंग उपलब्ध नाहीत, पण त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांवर आधारित ह्या काव्यपंक्ती आहेत...

संत सखू मंदिर कऱ्हाड  
संत सखुबाईचे चरित्र जुन्या संत कवींपैकी महिपती आणि मध्वनाथ यांनी लिहिले आहे. महिपतींनी आपल्या संत लीलामृताच्या ३५ व्या अध्यायात आणि मध्वनाथांनी एका अभंगबद्ध प्रकरणात हे चरित्र वर्णिले आहे. सखुचे चरित्र अगदी लहान आहे पण ते इतके वेधक आहे की कै. हरी नारायण आपटे व कै.प्र.के. अत्रे यांनी त्यावर नाटके लिहिली. संत सखुबाईच्या काळाविषयी निश्चित अशी माहिती उपलब्ध नसली तरी तिच्या चरित्रलेखकांच्या कालावधीवरून वाटते की सुमारे २२५ वर्षांपूर्वी संत सखुबाई होऊन गेली असावी.

संत सखुच्या आईचे वडील श्री. केसकर शिखर शिंगणापूरच्या शंभोमहादेवाचे पुजारी होते. त्यांना १ मुलगा व ३ मुली झाल्या. पण मुलाच्या अल्प वयात झालेल्या निधनाने व्यथित झालेल्या केसकरांनी शाहू महाराजांकडे कृष्णाकाठी राहण्याची काही सोय करण्याची विनंती केली. तारगावला दिलेल्या मोठ्या मुलीचेही निधन झाले, तेव्हा शोकाकुल अवस्थेत ते कऱ्हाडला दुसऱ्या मुलीकडे आले. त्याचवेळी शाहू महाराजांनी त्यांना कृष्णाकाठी विठ्ठलमंदिर बांधून दिले आणि त्याच्या सर्व व्यवस्थेसाठी वाटेगावाशेजारील 'शेणे' गावी काही जमिनी दिल्या. केसकर विठ्ठलभक्त असल्याने त्यांचा मंदिरात पूजाअर्चा व भजन कीर्तनात काल व्यतीत होत असे. अशाच विठ्ठलभक्ताची नात सखुबाई. मायणी गावच्या देशपांडे घराण्यात केसकरांच्या तिसऱ्या मुलीला दिले होते. तिचीच मुलगी सखुबाई. सखुबाईचा विवाह कऱ्हाडच्या शाहू महाराजांचे तीर्थोपाध्याय असलेल्या श्री. नारायण बदिरव गिजरे यांच्या घराण्यात झाला होता. तिच्याबद्दलची एक आख्यायिका आहे.

सखु साधी, सुशील आणि आजोबांसारखी विठ्ठलभक्त होती. असं म्हणतात की तिला सासरी जाच होता, पण सखु त्या जाचाला सकारात्मक दृष्टीने बघत पांडुरंगाचे आभार मानी. या दुःखामुळेच माझ्याकडून सतत पांडुरंगाचे स्मरण होते आहे. सुख समृद्धी मिळाली असती तर एवढे देवाचे नाव घेतले गेले नसते, उलट मोहमायेमध्ये अडकले गेले असते, असा विचार सखु करी.

संत सखू मंदिर कऱ्हाड
एकदा कृष्णा नदीवर पाणी भरण्यास गेलेल्या सखुला आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणारी वारकऱ्यांची वारी दिसली.
 सखुला त्यांच्या बरोबर पंढरपूर विठ्ठलदर्शनासाठी जाण्याची तीव्र इच्छा झाली व ती त्यांच्या बरोबर दिंडीत निघाली. घरी हे कळल्यावर सासूने सखुच्या नवऱ्याला तिला परत घरी घेऊन येण्यास सांगितलं. आईची आज्ञा मानून तिच्या पतीने सखुला घरी आणून खांबास बांधले व अन्नपाणी बंद केले. सखुबाईने विठ्ठलाचा धावा केला. तिच्या नितांत भक्तिभावाने आनंदी झालेल्या विठ्ठलदेवाने तिचेच रूप घेतले व तिच्या घरी येऊन स्वतःला खांबाला बांधून घेतले. सखुबाई दिंडीबरोबर पंढरपूरास गेली. तिथेच विठ्ठलचरणी तिने त्याचे नाव घेत देह ठेवला. वारकऱ्यांतील एकाने ( किवळ गावच्या वारकऱ्याने) तिला ओळखले व पंढरपूरमधेच तिचे अंत्यसंस्कार केले.

संत सखू मंदिर कऱ्हाड
इकडे रुक्मिणीदेवीला सखुबाईच्या घरी अडकलेल्या पांडुरंगदेवांची चिंता वाटू लागली. कारण खरी सखुबाई परत गेल्याशिवाय देव कसे परत येणार? तिने स्मशानभूमीत जाऊन सखुबाईच्या शरीरामध्ये प्राण भरले. सखुबाई परत जिवंत झाल्यावर तिला कऱ्हाडला परत जाण्यास सांगितले. सखुबाईचे अंत्यसंस्कार केलेला वारकरी जेव्हा तिच्या निधनाची बातमी सांगण्यास तिच्या घरी गेला तेव्हा तिथे सखुबाईला पाहून आश्चर्यचकित झाला. इकडे सखु पंढरपुराहून घरी आल्यावर पाणवठ्यावर सखुस्वरूपी पांडुरंग आले व सखुपुढे घागर ठेवून "बाई गं, आपली घागर घे, मी आता जातो" म्हणत अंतर्धान पावले. सखु घरी गेल्यावर तिचं प्रेमानं स्वागत झालं, कारण तिची योग्यता घरच्या मंडळींना कळली होती.
संत सखू मंदिर कऱ्हाड

चमत्काराचा भाग जरी सोडून दिला तरी विठ्ठलाचे ठिकाणी असलेली तिची अनन्यसाधारण भक्ती तिला संतत्वाप्रत नेती झाली व ती संत म्हणून प्रसिद्ध पावली. संत मालिकेतील संत सखुबाईचे स्थान अढळ आहे. कऱ्हाडला तिचं मंदिर आहे. अशा सखुबाईला आणि तिच्या अलोट भक्तीला व आमचा नमस्कार

ज्योती कुलकर्णी


4 comments:

  1. छान लेख सुंदर अभंग .चित्रातील मंदिर पाहून कराडला जाण्याचा मोह झाला

    ReplyDelete
  2. नीना वैशंपायनJuly 3, 2020 at 10:52 PM

    लेख आणि गाण खुप छान

    ReplyDelete