भल्या पहाटे
कोकिळेच्या गाण्याने जाग आली आणि उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागली. शिशिर संपता संपता
निसर्ग कूस वळवतो आणि वसंत ऋतूचे पहिले उबदार पाऊल अंगणात पडते. गोठवणारी थंडी जाऊन
वातावरणात हवाहवासा सुखद उबदारपणा येतो. पहाटेची गुलाबी थंडी अंगभर लपेटून अनुभवण्यात
काही औरच मजा असते.
खरं तर उन्हाळा,
पावसाळा, हिवाळा हे तीन ऋतू. निसर्गनियमानुसार प्रत्येक ऋतू आपल्या ठरलेल्या वेळी येतो.
निसर्ग सहसा कधी आपल्या नियमाला चुकत नाही. आल्यावर साधारणपणे तीनेक महिने तरी मुक्काम
करतोच. आपला हात सृष्टीवर फिरवतो आणि आपली वेळ संपली की हळुवार पावलांनी काढता पाय
घेतो. आणि पुढच्या ऋतूची आपल्याला चाहूल लागते. खरं तर प्रत्येक ऋतूची आपापली वैशिष्ट्ये
आहेत. निसर्गचक्रात प्रत्येक ऋतूचे स्वतःचे एक योगदान असते. पावसाळ्याची चाहूल 'पेरते
व्हा' पक्षी शेतकऱ्यांना देत आकाशात गिरक्या घेत असतो. मग पुढचे तीन महिने सगळ्यांचीच
धांदल उडते. मुसळधार पाऊस सुरू होतो आणि तप्त धरणी तृप्त होते. चहूकडे हिरव्या रंगाची
उधळण होते. शेतकरी सुखावतो. त्याची शेतीच्या कामाची लगबग सुरू होते. लोकांची छत्री,
रेनकोट सांभाळत ऑफिस गाठायची एकच धावपळ असते. घराघरांत सणवार सुरू होतात. असा हा पावसाळा
सगळ्यांनाच नवचैतन्य देतो. चराचर सृष्टीवर हिरवा शेला पांघरून हळूच माघारी वळतो. आणि
चाहूल लागते ती थंडीची. छत्री-रेनकोटची जागा स्वेटर्स आणि शाली घेतात. आणि सुरू होते
ती दसरा, दिवाळीची धामधूम. हळू हळू थंडीचा कडाका वाढत जातो आणि निसर्गाचे रूप पण पालटू
लागते. हिरवाई जाऊन शिशिराची पानगळती सुरू होते.
तुम्हाला
कोणता ऋतू आवडतो असे सहज जरी कुणालाही विचारले तर बहुतेक वेळा 'हिवाळा' हेच उत्तर मिळते.
जवळपास ८०% लोकांना हिवाळा आवडत असतो. १५% लोकांना पावसाळा आवडतो. आणि उरलेले ५% लोक
जे काहीच उत्तर देत नाहीत त्यांना कदाचित उन्हाळा आवडत असावा. तसा उन्हाळा फारसा कुणाला
आवडतच नाही. लोक हाश्श हुश्श करत घाम पुसत सतत बिचाऱ्याला शिव्या देत असतात. त्याच्या
नावाने खडे फोडत असतात. मला मात्र हिवाळा, पावसाळा तर आवडतोच पण अगदी मनापासून उन्हाळासुद्धा
आवडतो.


वातावरणात
आंब्याच्या मोहोराचा हवाहवासा घमघमाट सुटतो. इकडे कोकीळ कूजन सुरू होते. पहाटेची आल्हाददायक
हवा, नव्या कोवळ्या पालवीने सजलेली झाडे , लालपिवळ्या रंगांची उधळण करत आपल्या स्वागतासाठी
रस्त्यावर लालपिवळ्या फुलांच्या पायघड्या घालून गुलमोहोर, बहावा रस्त्याच्या कडेला
अदबीने उभे असतात. मोगरा, मदनबाण, चाफा, रातराणी, मधुमालती अशी अनेक प्रकारची फुले
सुवासाची उधळण करायला सज्ज होतात. वातावरण कसे सुगंधी होऊन जाते. आणि उन्हाची दाहकता
कमी व्हायला मदत होते.
सगळ्यतात
जास्त फळे तर या ऋतूतच येतात. रामफळ, सीताफळपासून सुरवात होते. मग कलिंगड, खरबूज, द्राक्ष,
पपई ही फळे नंबर लावतात. आणि मग मोठ्या दिमाखात बाजारात दमदार एन्ट्री घेतो तो आपणा
सर्वांचा अत्यंत आवडता सर्व फळांचा राजा 'आंबा'. शिवाय उसाचा रस, आईस्क्रीम, बर्फाचा
गोळा, पन्हं, आंबेडाळ आपल्या दिमतीला तत्पर असतातच. (आत्ताच सुटले ना तोंडाला पाणी?)

पटलं ना मग
तुम्हाला, उन्हाळासुद्धा मस्त असतो ते!
खरं तर नाण्याला
जशा दोन बाजू असतात, तसेच कोणत्याही गोष्टीकडे बघण्याच्या दोन बाजू असतात. एक सकारात्मक
आणि एक नकारात्मक. एखादी गोष्ट कितीही अवघड असो किंवा त्रासदायक असो त्यातील सकारात्मक
गोष्टी जर आपण शोधल्या आणि त्यांचा विचार केला तर अनेक अवघड गोष्टी सहज सोप्या होऊन
जातात.
काय पटतंय
का!
चला तर मग
या वर्षी उन्हाळा मस्त एन्जॉय करूयात.
वैजयंती डांगे
Chaan lekh Pratyek rutuchi maja vegli
ReplyDelete