समुपदेशन- १०-तणाव आणि मी -२

मागील भाग : समुपदेशन ९ तणाव आणि मी भाग १


'तणाव आणि मी' ह्या लेखाच्या पहिल्या भागात पाहिले की आपण तणावाखाली आहोत हे लक्षात येणे सर्वात महत्वाचे. अन्यथा अनवधानाने तुमची immune system सदैव कार्यरत राहते. आणि stress च्या परिणामांना सामोरे जावे लागते. आपल्या स्वभावात/विचारात/कृतीत होणारे बदल, हे आपल्या संपर्कात येणारे कुटुंबीय/नातेवाईक /मित्र /सहकारी ह्यांच्या लवकर लक्षात येण्याची शक्यता असते. त्यांनी जर आपल्यातला हा बदल लक्षात आणून दिला तर त्याचा विचार करणे योग्य ठरते. नेमका कोणता बदलयाचाही खुलासा करून घ्यावा. त्यामागची कारणमीमांसा समजून त्यावर विचार करावा. हे फायद्याचे असते. माझा स्वभाव कसा आहे? एखादी गोष्ट पूर्ण होईपर्यंत चिंता वाटते का? कामात लक्ष न लागणे, बारीक सारीक गोष्टीवरून चिडचिड, भांडणं, खाण्याच्या सवयीत बदल - भूक नसताना खाणे असो किंवा भूक असताना न खाणे असो.

तणावयुक्त ते तणावमुक्त जीवन हा प्रवास जरी साधा, सोपा /सरळ नसला तरी अशक्य किंवा अवघड  निश्चितच नाही.

कठीण परिस्थितीला फार काळ सामोरे जावे लागले की स्वभावात, विचारात, कृतीत बदल होतो. असा बदल नेमका कधीपासून आणि कशामुळे (प्रसंग, घटना) झाला आहे? झोप आणि व्यायाम आणि आहार यावर परिणाम झाला आहे का? ह्याचा जरा खोलात जाऊन विचार केला गेला म्हणजे तणावाचे कारण समजायला मदत होते. आपल्या विचारांची दिशा समोर आलेल्या समस्येवरचा उपाय, पर्याय शोधण्याकडे वळवावी. यासाठी तज्ञांचा अनुभवी लोकांचा, वडिलधाऱ्यांचा सल्ला, मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते. योगासने, meditation आणि प्राणायाम हे ही stress कमी करण्यास मदत करतात. आपल्या मते सर्वात प्रभावी आणि अमलांत आणण्याजोगा जो पर्याय निवडला असेल त्याप्रमाणे तो लगेच कृतीत आणणे. मी, माझे फक्त बरोबर, नेहमी मीच का सामंजस्य दाखवायचे?, हट्टी, दुराग्रही वृत्ती कडून थोडेसे सोडून देणे (let go) जमले, तर बरेच प्रश्न लवकर सोडविता येतात. सगळ्या परिस्थितीचा साकल्याने विचार करता येतो.

संपदा (नाव बदलून ) २८ वर्षाची हुशार कर्तबगार आई. नोकरी आणि घर अगदी उत्तम सांभाळत होती.
अलीकडे तिला जाणवत होतं की ती कसल्यातरी तणावाखाली आहे. कामं संपतच नव्हती. ऑफिसमध्ये, घरी अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून तिचे सारखे खटके उडत होते. नेमके काय होतंय हे समजत नव्हते. counselling session मध्ये तिच्याशी बोलल्यावर असे लक्षात आले की बरेच दिवसात तिला स्वतःसाठी असा वेळ मिळालेला नाही. वाचन, लेखन याची तिला फार आवड होती. ती सांगत होती तिला हातात पुस्तक धरायलासुद्धा वेळ मिळत नाही. लेखन तर फार दूरची गोष्ट झाली. सवडच मिळत नाही.

शोधले तेंव्हा समजले की ह्याला कारण तिचा स्वभाव. सगळी कामं माझ्या पद्धतीने झाली पाहिजेत. शिस्त म्हणजे शिस्त, नियम हे पाळले गेलेच पाहिजेत अशी काटेकोर(हेकेखोर) वृत्ती. या तिच्या स्वभावाचे फायदे जरी होते तरी घरी किंवा ऑफिसमध्ये या हेकेखोरपणामुळे तिच्यावरच सगळ्या कामाची जबाबदारी यायची. आमच्या बोलण्यातून तिला समजले, अगदी रोज मिळाला नाही तरी ठरवून आपल्यासाठी वेळ काढायला हवा. कामाविषयी जेंव्हा चर्चा केली तेंव्हा तिच्या लक्षात आले की खरंच एखादे काम थोडेसे पुढे मागे करूच शकतो. एक आठवडाभर रोजचे रोज दिवसाचे वेळापत्रक करून कामाची आखणी केल्यावर तिच्यासाठी वेळ मिळाल्यावर तिचे तिलाच बरे वाटायला लागले. स्वतःसाठी थोडा वेळ ( me time ) हा काढायलाच हवा.

सौरभ (नाव बदलून) चाळिशीतला गृहस्थ. स्वभाव अतिशय शांत. कधी कोणाला बोलून दुखावणार नाही. घरात एक दिवस प्रॉपर्टी वरून भावाबरोबर खूप मोठे भांडण झाले. एरवी कधीही मोठ्याने न बोलणारा सौरभ एकदम मोठ्याने ओरडून भावाला सांगत होता, माझ्या चांगुलपणाचा आत्तापर्यत सर्वानी फायदा घेतला. पण आता पुरे. मी आता अजिबात गप्प बसणार नाही. त्याच्या आत एवढा राग होता ह्याचा त्यालाही अंदाज नव्हता. पण त्या दिवसापासून त्याचे झोप, जेवण-खाणे, यावरचे लक्ष उडाले. डोक्यात सारखा एकच विचार  माझा सगळे फक्त फायदा करून घेतात. तो त्याच्या डॉक्टरांकडे जाऊन आला. त्यांनी औषधयोजना केली. थोडे दिवस बरे वाटले. पण प्रत्येकाशी वागताना तो सावधगिरी बाळगू लागला. घरात गप्प गप्प राहू लागला. त्याच्या बायकोने एकदा psychologist ला भेटून counselling घेऊयात का? असा पर्याय सुचवला. विचार करून मग दोघे जण समुपदेशनासाठी साठी आली होती.

सौरभला आपल्याला नेमके काय वाटते हे सांगण्याचा संकोच करायची सवय झाली होती. लोक आपल्याला काय म्हणतील? आपलं चुकलं तर हसतील ही भीती. ह्या भीतीची सुरुवात अगदी लहानपणी शाळेत असताना झाली होती. दोन्ही भावांत आई वडिलांनी केलेल्या तुलनेचा हा नकळत घडलेला परिणाम होता. त्याला assertiveness आणि communication skills training ची गरज होती. आपली मते दुसऱ्याला न दुखवता निर्भीडपणे मांडता येतात. मनात असेल तर ते मोकळेपणाने व्यक्त करावे. त्याची स्पष्टपणे कारणमीमांसा करता येणे आवश्यक असते. लोकांची मते वेगळी असूच शकतात. त्यामुळे ऐकणे हे महत्वाचे असते. शब्दांची निवड करताना आपण कोणाशी बोलतो, काय बोलतो आणि केंव्हा बोलतो याचा विचार केल्याने अर्धे प्रश्न सुटतात.

मनात असलेले व्यक्त न केल्याने अधिक गैरसमज होतात. विचार आणि कृती यातील तफावत असो किंवा फारकत असो मनात नेहमी गोंधळ निर्माण करते. मनाप्रमाणे घडले नाही किंवा ठरल्याप्रमाणे झाले नाही तर मन कधी स्वतःला नाहीतर दुसऱ्यांना दोष देते. नेहमी असे अनुभव येऊ लागले मग आपले कोणी ऐकत नाही असे वाटून मन उद्विग्न होते. याचा हळूहळू स्वभावावर, व्यक्तिमत्त्वावर परिणाम होऊ लागतो. नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. आपण एकटे आहोत अशी भावना होते. ह्या दुश्चक्राचा परिणाम तब्ब्येतीवरही दिसू लागतो. पण विचार आणि कृतीत एकवाक्यता कशी आणता येईल याचा प्रयत्न होणे गरजेचे असते.

नवा दृष्टीकोन
काही वेळा एखादी कल्पना डोक्यात ठाम बसलेली असते. त्यावर गाढ विश्वास असतो. आणि समजते की ही कल्पना बदलणे आवश्यक आहे. असा बदल सहज अंमलात यायला वेळ लागतो. एका ७५ वर्षाच्या आज्जींचे नुकतेच कमरेचे operation झाले. साडी नेसणे शक्य नव्हते. पण आज्जी gown  घालायला तयार होईनात. कोणाचे ऐकेनात. शेवटी त्यांची नात जेंव्हा म्हणाली, आज्जी तू gown घाल मग तुला कसं सुटसुटीत वाटेल. लगेच बरं वाटेल आणि आपल्याला घरी सुद्धा जाता येईल. आजीला हे पटले. आणि ती gown घालायला तयार झाली.

Grief counselling
संकट हे सांगून येत नाही. अनपेक्षितपणे अशी एखादी बातमी समजते की त्याचा विचार ही मनात नसतो. अगदी जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख, गंभीर आजाराचे निदान असे काही घडले तर यावर आत्ता या घटकेला काय करू शकतो? अशावेळी आपल्या support system ची विनासंकोच मदत घ्यावी. आणि ह्या अचानक आलेल्या दु:खाला सामोरे जावे.

माझे नेहमी चुकते का?  लोक मलाच का दोष देतात!!, मीच का? हा प्रश्न परत परत मनात येतोच. पण सभोवतालचे वातावरण, नातेसंबंध, कुटुंबीय, कामानिमित्त संपर्कात येणारी सहकारी मंडळी या सर्वाना बदलण्यापेक्षा मी स्वतःला, माझा व्यक्तिगत दृष्टीकोन, स्वभाव बदलू शकतो का? आणि कसा? असा विचार केला तर याचे उत्तर आहे हो. का नाही येणार?? जमणार नक्की जमणार कारण तेच सोपे आहे.

तणावयुक्त ते तणावमुक्त हा प्रवास शेवटी आपला एकट्याचा असतो. मला मिळालेले जीवन हे येणाऱ्या परिस्थितीवर मात करत आनंदात जगायचे हे आपले ध्येय आहे.

डॉ.पूर्वा रानडे



1 comment:

  1. Neena VaishampayanJuly 3, 2020 at 11:00 PM

    अगदी योग्य विचार छान पद्धतीने मांडले आहेत.

    ReplyDelete