गप्पा आसावरी जोशी यांच्याशी!


आसावरी जोशी हे नाव नाट्य-चित्र रसिकांना काही अनोळखी नाही. सिनेमा, नाटक, हिंदी-मराठी मालिका, जाहिरात या सर्व माध्यमांत त्यांनी काम केले आहे. गेली २५ वर्षे या सर्व माध्यमात त्या सहजतेने वावरत आहेत. 'दाग! ढूंढते रह जाओगे' म्हणणारी आसावरी घराघरांत पोहोचली. 'ऑफिस ऑफिस' सारखी विनोदी मालिका, 'चारचौघीसारखे गंभीर नाटक, यातील विविध भूमिकांत त्यांनी आपला ठसा उमटवला. अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

विनोदी भूमिका साकारणे हे वाटते तितके सोप्पे नाही. ते करताना येणारे अडथळे, त्यातील बारकावे त्यांनी रसिकांना उलगडून सांगितले. काही मजेदार किस्सेही त्यांनी श्रोत्यांना ऐकवले. त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या पण प्रदर्शित न झालेल्या 'तांदळा' चित्रपटाबद्दल त्यांना वाटणारी रुखरुख त्यांनी मोकळेपणाने मांडली.

त्यांचा हा थोडा सिरीयस मूड बदलण्यासाठी मी झटपट प्रश्न (rapid fire) विचारायला लागले. जसे तुम्हाला व्यक्ती म्हणून कोण आवडते? सचिन की अमिताभ?, कोणते diet? दीक्षित की दिवेकर? या चटपटीत प्रश्नांची उत्तरेही त्यांनी खास 'आसावरी' विनोदी शैलीत दिली.

ह्या मुलाखतीला हळुहळू गप्पांचेच स्वरूप आले. कारण मग रसिकांनीही अनेक प्रश्न विचारायला सुरवात केली. मग जणू एक गप्पांची मैफिलच जमली. आसावरी जोशीही अगदी मनमोकळेपणाने उत्तरे देत होत्या. भुकेची जाणीव झाल्यावरच शेवटी ही गप्पांची मैफिल आटोपती घ्यावी लागली.


मित्रमंडळाच्या चोखंदळ प्रेक्षकांकडून ह्या कार्यक्रमाला पसंतीची दाद मिळाली. ह्यातच या कार्यक्रमाचे यश आहे.

स्वाती निरंजन



























No comments:

Post a Comment