पाऊस - मराठी कवितेतला !


पाऊस मनामनातला . .  

पाऊस आठवणीतला
खुदु खुदु हसवणारा 
खोटे खोटे पैसे देवून 
मोठा मोठा येणारा

पाऊस आठवणीतला
धो धो कोसळणारा 
शाळेच्या खिडकीतून 
हळूच खुणावणारा

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनाला स्पर्शून जाणारा  निसर्गाचा अद्भूत खेळ म्हणजे पाऊस.
तसा पाऊस या विषयावर वर्षानुवर्षे अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत. पावसाकडे प्रत्येक कवी  कसा वेगवेगळ्या सुंदर नजरेने पाहतो आणि कविता प्रत्येक पिढीनुसार कशी तरुण होते पहा…… 
( अर्थात तुलना करणे असा हेतू अजिबात नाहीये.. )

नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?

इंदिरा संत 

कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही,
आम्ही आसवांनी शेते भिजवली.. 
यशवंत मनोहर 


ए आई मला पावसात जाउ दे ।
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।।
मेघ कसे बघ गडगड करिती ।
विजा नभांतुन मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे ।।

- वंदना विटणकर 


नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती, गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।
- शांताबाई शेळके 


पाऊस कोसळे हा अंधारलेले दिसे 
डोळे भरून आले माझे असे कसे?
- मंगेश पाडगांवकर 


मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले । घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।
पाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी । 
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी ।। 
मन चिंब पावसाळी …….
- ना . धों . महानोर .


ढग दाटून येईल,
झाड नवीन होईल.. 
अरुणाताई ढेरे 


मोकळा उदासीन वारा,
नभ भरून आले वरती,
गाण्याच्या जन्मासाठी,
अन मनात भिजते माती..
अरुणाताई ढेरे 


आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।
                                
- सुधीर मोघे 



नाही कधी का तुम्हास म्हटलं
दोष ना द्यावा फुका ।अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।
लई गार हा झोंबे वारा ।अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।भिजली साडी भिजली चोळी, भंवतील ओल्या चुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ॥                                                                                  .                            -( लावणी )- वसंत सबनीस .



थेंबांना सावरलेल्या,
त्या गवताच्या काडांचा,
पाऊस पडून गेल्यावर,
मी भिजलेल्या झाडांचा.. 
किशोर कदम



काही म्हणा तो आहेच वेगळा नाहीतर असतातच कि हिवाळे अन उन्हाळे

पण अनुभव किती हे सांगायलाही म्हणतातच ना "मी पाहिलेत इतके पावसाळे"

- कल्याणी बोरकर

मराठी कवितांमध्ये व्यक्त झालेल्या पावसावरच्या असंख्य छटांचा पेैकि या काही छटा. अजून बऱ्याच राहूनही गेल्या असतील. पण बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना हातात गरम वाफाळता चहा घेऊन आठवलेल्या या काही ओळी. वाचकांना अशा अजून काही कविता आठव्या अडत्यांनी पाठवल्या तर पुढील अंकात प्रसिद्ध करायला नक्कीच आवडेल.

No comments:

Post a Comment