खामोशी - एक सर्वांग सुंदर सिनेमा


खामोशी'च्या वेळेस वहिदाचं वय होतं एकतीस वर्षांचं, धरम होता चौतीसचा आणि हँडसम राजेश खन्नाचं वय सत्तावीस वर्षांचं. कथेतील ही तीनही पात्रं याच वयाची होती. चित्रीकरणादरम्यान वहिदा प्रचंड डिप्रेस्ड झाली होती. कारण गुरुदत्तला जाऊन जेमतेम चार वर्ष झाली होती. जो किस्सा तिच्यामुळे गुरुदत्तच्या आयुष्यात घडला होता तो तिला इथे विरुद्धअर्थाने निभावायचा होता. हा वहिदाच्या संपूर्ण करिअरमधला
सर्वात सशक्त आणि सरस रोल ठरला. अख्खा सिनेमाभर तिचं अस्तित्व जाणवत राहतं. तिचं सावकाश चालणं, मान वेळावून बघणं, कपाळावरील महिरपीतून कानाजवळून रेंगाळणाऱ्या बटांना दुर्लक्षित उस्मरत राहणं कमालीचं भावतं. वहिदाच्या आयुष्यात जी वादळं येऊन गेली त्याची ही रिव्हर्स इमेज होती, जिला तिने समरसून न्याय दिला. हा कालखंड स्वातंत्र्योत्तर पहिल्या दोन दशकातला होता ज्यात
आयडियालिझम आणि रोमँटीसिझमने पडदा व्यापला होता. त्याची छाप संवाद आणि पात्ररचनेत स्पष्ट दिसते. सामाजिक दृष्ट्या अगदी मागच्या दोनेक दशकापर्यंत आपल्याकडे 'नर्स' या घटकास समाजाने चारित्र्याच्या दृष्टीने नेहमी संशयाने पाहिले आहे. डॉक्टरांशी तिचे काहीतरी लफडे असू शकते किंवा अफेअर करणारं प्रोफेशन हाच दृष्टीकोन असायचा. त्याला टोकदार छेद देत आशुतोष मुखर्जींनी हे एक नोबल प्रोफेशन आहे हे बिंबवतानाच ती एक प्रेमसुलभ भावना असणारी विविध नात्यांनी बांधली गेलेली स्त्री आहे हा रिव्होल्यूशनरी अँगल मांडला. असे असूनही या सिनेमाला फारसा लोकाश्रय लाभला नाही. एक धक्कादायक शेवट, शोकांतिका आणि स्त्रीप्रधान कथानक अशा फारशा उठावदार बाबी नसूनही 'खामोशी'ने इतिहास घडवला.

'वो शाम कुछ अजीब थी' हे अवीट गोडीचं गाणं याच 'खामोशी'मधलं. पुन्हा पुन्हा पहावा आणि स्वतःशीच पडताळून घ्यावा असा सिनेमा म्हणजे 'खामोशी'. मागे एका प्रसिद्ध समीक्षकाने लिहिलं होतं की मरण्याआधी पुन्हा एकदा 'खामोशी' बघेन आणि मग प्राण सोडेन. इतकं काय होतं त्या सिनेमात? आपण ज्या पुरुषावर प्रेम करतो तो दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो हे कळले की कोणतीही संवदेनशील स्त्री उन्मळून पडते. त्या दुःखातून सावरण्यासाठी तशाच एका समदुखी जीवाला अशाच वेदनेतून बाहेर पडण्यास मदत करते. तिला वाटते की तो आता आपल्यावर प्रेम करू लागलाय. प्रत्यक्षात एका मानसिक आजारातून तो बाहेर पडावा यासाठीची ती एक क्रिया असते. हे कळल्यावर तिचं भावविश्व हादरून जातं. इतरांचे प्रेमविश्व बरे करण्याच्या नादात तीच वेडी होते. अखेरीस तिने बऱ्या केलेल्या प्रेमवेडयाला ती पूर्ववत होण्याची आस लागून राहते.

'खामोशी'चे संवाद गुलजार यांनी लिहिले होते तर स्वतः असित सेननी (आराधना चित्रपटातील विनोदी नातं नव्हे) त्याची पटकथा लिहिली होती. हेमंतकुमार यांनी संगीताची बाजू सांभाळली होती तर गीते गुलजारजींची होती. वहिदा रेहमान, राजेश खन्ना, धर्मेंद्र, नाझीर हुसेन, इफ्तिकार, ललिता पवार, देवेन वर्मा अशी मुख्य स्टारकास्ट होती. जेमतेम दहा महिन्यात याचं चित्रीकरण पुरं झालं होतं. 'खामोशी' रिलीज झाला होता २५ एप्रिल १९६९ ला. 'आया सावन झूम के' - धर्मेंद्र, 'धरती कहे पुकार के', 'जीने की राह' - जितेंद्र, 'बंधन', 'आराधना', 'दो रास्ते'- राजेशखन्ना, 'तुमसे अच्छा कौन है' - शम्मी, 'तलाश' - राजेंद्रकुमार असे हिट नायकांचे हिट सिनेमे याचवर्षी आले होते त्यांना टक्कर देत वहिदाचा 'खामोशी' सुपरहिट झाला. हा काळ सुपरस्टार राजेशखन्नाचा सुवर्णकाळ होता. १९६९ ते १९७१ या दोन वर्षात सलग सतरा सुपरहिट सिनेमे त्याने दिलेले. त्यातले तब्बल पंधरा सिनेमे सोलो रोलचे होते! हे सांगण्याचे कारण म्हणजे खामोशी हा नायिकाप्रधान चित्रपट होता! काहींनी याचे श्रेय राजेश खन्नाला देण्याचा प्रयत्नही केला होता. वहिदाच्या इतकेच अन्य बिंदू जास्त महत्वाचे आहेत. असितसेन, गुलजार, हेमंतकुमार यांच्या जोडीने ते नाव होते कमल बोस यांचे!

राधा (वहिदा) ही डॉ.कर्नल साहब (नाझीर हुसेन) यांच्या मानसोपचार रूग्णालयातील परिचारिका असते. वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या केसेस केवळ मानसिक आधाराच्या जोरावर नीट करता येतात हे डॉक्टरांना दाखवून द्यायचे असते. असाच एक तरुण अविवाहित रुग्ण देव यास त्यांनी बरं केलेलं असतं. देवच्या इलाजासाठी राधाला त्याच्या भावविश्वात गुंतून पडावं लागतं. देव बरा होतो पण राधाचं त्याच्यावर प्रेम जडतं. केवळ इलाजासाठी आलेल्या देवला राधाचं प्रेम उमगत नाही तो तिथून निघून जातो. तो बरा झाल्यावर त्याचं हरवलेलं प्रेम त्याला परत मिळतं ; त्याचं लग्न होतं. दरम्यानच्या काळात कर्नलसाहब देवसारखीच अजून केस घेतात जेणेकरून इलेक्ट्रिक शॉकशिवाय असे रुग्ण बरे होतात यावर शिक्कामोर्तब व्हावं. ही केस असते अरुणची. ज्याला सुलेखाने प्रेमात दगा दिलेला आहे. अरुणला त्याच्या आयुष्यात कोणतीच स्त्री मंजूर नसते पण सुलेखा त्याच्या मेंदूतून बाहेर पडत नसते. डॉक्टर ही केस घेण्यासाठी राधाची विनवणी करतात पण ती त्यांना नकार देते कारण देवच्या अशाच केसमध्ये तिला प्रचंड मानसिक त्रास झालेला. ती त्याला विसरूच शकली नव्हती. तिचं प्रेम होतं आणि त्याच्यासाठीचा तिचा इंतजार अजून संपलेला नव्हता. राधाऐवजी अन्य नर्सेस प्रयत्न करून पाहतात पण अरुण कुणाला बधत नाही. अपघाताने राधाला त्या केसमध्ये पडावं लागतं. पुन्हा तोच खेळ होतो. काही महिन्यात अरुण बरा होतो. त्याचं तिथून आपल्या गावी परत जाणं निश्चित होतं आणि आपण पुन्हा या खेळात हकनाक आपला जीव गुंतवून बसलो हे राधाला उमगतं. हा धक्का ती सहन करू शकत नाही. त्याच रुग्णालयात तिला रुग्ण म्हणून राहावं लागतं. देव आणि अरुण यांच्यात ती स्वत्व हरवून बसते. यातून बाहेर यायला किती वेळ लागेल हे ठाऊक नाही पण बरा झालेला अरुण क्लायमॅक्सला राधाला ज्या खोलीत बंद केलेलं असतं तिथे येऊन सांगतो की, अखेरच्या श्वासापर्यँत तो राधाची प्रतिक्षा करेन. "मैं तुम्हारा इंतजार करुंगा" हे अरुणचे वाक्य राधाच्या कानात घुमत राहतं. रूमला असलेल्या जाळीच्या दरवाजापाशी ती कोलमडून पडते. शेवटी जाळीवरून घसरत जाणारे तिचे रिते हात दिसतात आणि सिनेमा संपतो.

'खामोशी'ची अनेक वैशिष्टये आहेत. यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल इतकं कंटेंट यात आहे. 'खामोशी' पाच गाणी होती. पाचच्या पाच सोलो गाणी होती. पाचही गाणी भिन्न गायकांनी गायली होती हे एक आगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लता मंगेशकरांच्या आवाजातले "हम ने देखी है, इन आखों की महकती खुशबू' हे अप्रतिम गाणं यातलंच. "तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है" हे हेमंतकुमारनी गायलेलं गाणं कोणता रसिक विसरेल बरे? मन्ना डेंच्या आवाजातलं "दोस्त कहां कोई तुमसा" आणि आरती मुखर्जीच्या आवाजातलं 'आज की रात चरागों की लौ" हे अर्थपूर्ण गाणं यात होतं. पाचवं गाणं म्हणजे किशोरदांच्या आवाजातलं "वो शाम कुछ अजीब थी"... आधी सांगितल्याप्रमाणे हा सिनेमा जसा सशक्त अभिनेत्यांच्या दमदार अभिनयाचा होता, गुलजारजींच्या तरल संवादांचा होता, तसाच तो कमल बोस यांच्या विलोभनीय छायाचित्रणाचाही होता. पडद्यावर झळकणाऱ्या लोकांचा आणि प्रकाशझोतातील लोकांचा नेहमीच उल्लेख होतो पण ज्यांचे मोलाचे योगदान असूनही अगदी नाममात्र प्रसिद्धी ज्यांच्या वाटेस येते त्यात समावेश असणाऱ्या सिनेतंत्रज्ञात सिनेमॅटोग्राफर्सचे नाव अग्रस्थानी असेल. कमल बोसनी बिमल रॉययांच्या बहुतांश चित्रपटांचे छायाचित्रण केलं होतं. 'परिणीता', 'बंदिनी', 'दो बिघा जमीन', 'देवदास', 'सुजाता' या ब्लॅक अँड व्हाईट जेम साठी ते परिचित आहेत. रुपेरी पडदा रंगीत झाल्यावर त्यांनी फिरोज खानच्या 'धर्मात्मा', 'कुर्बानी', 'दयावान', 'जाँबाज'ला चार चाँद लावले होते. त्याच कमल बोस यांच्या जादुई कॅमेऱ्याने 'खामोशी'ला बोलकं केलं आहे. मी तर जेंव्हा जेंव्हा खामोशी पाहिला आहे तेंव्हा तेंव्हा त्यातली प्रत्येक फ्रेम नव्याने रसरसल्यासारखी वाटते. छायाचित्रण हा या सिनेमाचा प्राण आहे. कमल बोसना 'खामोशी'सह 'बंदिनी', 'अनोखी रात','दस्तक' आणि धर्मात्मासाठी छायचित्रणाचं फिल्मफेअर मिळालं होतं हे उल्लेखनीय.

'खामोशी'ची सुरुवात हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरील रुमच्या सज्जात वहिदा उभी असते तिथून होते आणि अंत रूम नंबर २४ मधील दारावरील जाळीवर हात खरडणाऱ्या वहिदाने होते. याच २४ नंबरच्या खोलीत कधी काळी धर्मेंद्र, नंतर राजेशखन्ना ऍडमिट असतात. हॉस्पिटलमधील खोल्या, कॉरीडॉर, आतले सज्जे, खोल्यांना लागून असणारी बाल्कनी, दरवाजे, रिकाम्या खुर्च्या, प्रशस्त टेबले, जाळीदार दरवाजे, फुलांची चित्रे असणारी बेडशीट्स, प्रशस्त कमनीय जिने, काचेच्या तावदानांच्या खिडक्या ही सगळी या सिनेमातील पात्रे वाटू लागतात. गाण्यांचे चित्रीकरण कसे असावे याचा कुणाला अभ्यास करायचा असेल किंवा प्रकाश रचना कशी असावी, कॅमेऱ्याचा टेक ऑफ कसा असावा, अँगल ऑफ व्ह्यू कोणता ठेवावा, सिनेमॅटोग्राफीचे बेसिक्स काय असतात हे कुणाला शिकायचे असेल तर त्याने 'खामोशी'ची गाणी पहावीत. प्रत्येक गाणं स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. या पोस्टमध्ये "वो शाम कुछ अजीब थी.."हे किशोरदांचे अजरामर गाणे.

अरुणच्या तब्येतीत बऱ्यापैकी फरक पडल्यावर त्याला हॉस्पिटलबाहेर जाण्याची अनुमती मिळते. डॉक्टरांचा हा निर्णय त्याला राधा कळवते. तोवर राधाला हेही कळलेय की आता काही दिवसांत अरुण इथे जाणार आहे. या आधी देव आपल्याला सोडून गेला होता, त्याच्या स्मरणात आपलं प्रेम राहिलं नाही आणि आता अरुणबरोबरही आपल्या मनाचे तार जुळलेत पण त्याच्या आयुष्यात आपल्याला स्थान असेल का? मग आपण देवशी ठेवलेलं नातं कोणतं होतं? की आपल्याला पुन्हा 'इंतजार' करावा लागणार? अशा अनेक प्रश्नांनी तिला ग्रासलेलं आहे. त्याचं मन रिझवण्यासाठी ती त्याला घेऊन जाते, त्याच ठिकाणी जिथे कधी काळी मन रिझले होते. या सिच्युएशनला हे गाणं आहे. संपूर्ण गाण्यात राधा आणि अरुण एका होडीत दिसतात. कोलकत्त्याच्या मस्तकाशी असलेल्या गंगेच्या विस्तीर्ण पात्रात, हावडा ब्रिजखालून पुढे जात हे युगुल आपल्या डोळ्यापुढे तरळत राहतं.

गाण्याची सुरुवात होते तेंव्हा कॅमेरा पाण्याच्या अत्यंत संथ पात्रावर फिरतो. त्यात हळूच हात घालून आपल्या हृदयातील तरंग जाणून घेणारा राधेच्या पुढ्यात ओणवा झालेला अरुण गुणगुणतो - "वो शाम कुछ अजीब थी, यह शाम भी अजीब है.. "! बंद गळ्याचे स्वेटर घातलेला, नेटके केस विंचरलेला, फ्रेश मूडमधला क्लीन शेव्हड राजेशखन्ना कमालीचा आकर्षक वाटतो पण त्याच्या चेहऱ्यावरचे काही तरी गमावल्याचे भाव टिपलेत कमल बोसच्या कॅमेऱ्याने! त्याच्या शेजारी बसलेली काळ्या ठिपक्यांच्या फिकट राखाडी साडीवर, पांढरया नाजूक फुलांची वेलबुट्टी वीणलेलं गर्द काळे स्वेटर परिधान केलेली, विमनस्क चेहऱ्यातली उदासवाणी राधा दिसते. या संपूर्ण चित्रपटात पांढऱ्या वेशातल्या नर्सेस आणि पांढऱ्या कोटमधील डॉक्टर्स दिसतात पण मधूनच फुलांच्या, मोठाल्या डिझाईनच्या जॉर्जेटच्या साड्या घातलेली फ्लॅशबॅकमधली वहिदा दिसली की वाऱ्याची शीतल झुळूक यावे तसे सुखद फील येतात. याही सीनमधल्या वहिदाला ही साडी, स्वेटर अत्यंत खुलून दिसतात. गाण्याचा मुखडा होईपर्यंत हेलकावे खाणारी होडी आणि त्यात दोलायमान मनस्थितीत बसलेली वहिदा डोक्यात ठाण मांडून बसतात. शिवाय ओळीही अर्थपूर्ण असल्याने त्यात गहिरी अधीरता येते. अरुण त्याच्या सुलेखासोबतच्या आठवणीबद्दल बोलतोय तर राधाचे मनही देवच्या आठवणीत व्याकुळ होते. होडी हावडा ब्रिजखालून पुढे येते हा सीन असा अप्रतिम शूट केलाय की पाहणाऱ्याला वाटावे की आपणही त्या होडीत बसलो आहोत. सॅल्यूट टू कमल बोस.

"झुकी हुई निगाहो में, कही मेरा ख़याल था दबी दबी हंसी मे इक, हसी सा गुलाल था" या ओळी गाणारा अरुण तिच्या मांडीवर डोकं ठेवून आपलं मन मोकळं करतोय तर नदीच्या पात्रातून राधाच्या तोंडावर उडणारे जलतुषार तिला देवची आठवणही करून देतात आणि भानावरही आणतात. त्याला हायसे वाटतेय की आपण तिच्या कुशीत आहोत, ती खेचल्यागत त्याच्या केसातून हळुवार बोटे फिरवते आहे पण तिचे चित्त स्थिर नाही. दोघांच्या हाताचे पंजे शेजारी शेजारीच असतात पण एकमेकात गुंतलेले नसतात. तिच्या मांडीवरून पुढे रेलून तो आता होडीच्या पृष्ठभागावर झोपलेला दिसतो. "मै सोचता था, मेरा नाम गुनगुना रही है वोह.." या पंक्तीत वरचे स्वर लागतात आणि ढोलकीचे बीटस येतात तेंव्हा पडद्यावरचे दृश्य फार विहंगम आहे. शीड फडकावत पुढे जाणारी होडी, तिच्या डेकच्या एकसमान फळयांच्या सपाट पृष्ठभागावर पाठ टेकलेला अरुण, त्याच्या शेजारची गोंधळून गेलेली राधा आणि होडीच्या बाजूने वेगाने वाहत जाणारं गंगेचं पाणी. स्वर जसे चढत जातात तसा होडीचा वेग वाढत जातो हे पाण्यावरून उमगते. पुढच्या पंक्तीत साउंडटोन खाली आल्यावर पाणी पुन्हा संथ दिसतं, हेलकावे कमी झालेले दिसतात आणि राधाच्या मिठीत असलेला पाठमोरा अरुण दिसतो. दोघांचे काळे पांढऱ्या रंगाचे स्वेटर एक होताना दिसते. "यही ख़याल है मुझे, के साथ रही है वो" या ओळी गाणारा अरुण होडीवर अंग टाकतो आणि राधा त्याच्यावर अलगद रेलते. या पूर्ण गाण्यात पाण्याच्या प्रवाहाचा वापर खूप सुरेख चितारला आहे. नेमक्या शब्दाला होडीच्या मागून जाणाऱ्या अजस्त्र बोटी वेगळे संदर्भ देऊन जातात. होडीचा वेग आणि कॅमेरा याचं जे संतुलन आहे त्यासाठी शब्द कमी पडावेत. पूर्ण गाण्यात आकाश निरभ्र दिसते आणि त्याची एक धूळकटलेली डल फ्रेम राधाच्या मनातील मळभ गडद करत जाते.

पूर्ण सिनेमात "तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है.." या गाण्याच्या शेवटी असलेली शीळ काळजाचे पाणीपाणी करून जाते आणि गाण्याच्या सुरुवातीचं हमिंग मनात घर करून राहतं.... या सिनेमाबद्दल आणि यातल्या गाण्याबद्दल लिहावं तितकं कमी आहे. सिनेमा हिट झाल्यावर रेडीओ सिलोनवर एका मुलाखतीत हेमंतकुमारना विचारले गेले की, "'खामोशी'चे तुम्ही निर्माते आणि संगीतकार देखील आहात मग 'वो शाम कुछ अजीब थी .. ' हे तुम्ही स्वतः गाता किशोरदांना का दिलं ?" यावर त्यांनी दिलेलं उत्तर अद्वितीय होतं. "त्या गाण्याचा जन्मच त्याच्या आवाजासाठी झाला होता, मी फक्त पाळण्यात घातलं, लोरी तर त्यानंच (किशोरदा) गायला हवी ना?" एक संगीतकार जो गायक आहे तो दुसऱ्या गायकाबद्दल किती आदराने आणि प्रेमाने बोलतो याचे हे विलक्षण बोलके उदाहरण आहे. अर्थात आता काळ बदलला आहे आणि त्या भावनाही लोप पावल्या आहेत..

'वो शाम कुछ अजीब थी'चे अचूक अर्थ लावायचे असतील तर 'खामोशी' बघायलाच हवा.

एवढा सुंदर सिनेमा तरी तो विशेष चालला नाही त्यामुळे निर्मात्यांना जवळ जवळ ३६ लाख रुपयांचा फटका बसला हे खरोखरच दुर्दैव्य आहे.


- श्रीहरी कुलकर्णी 

No comments:

Post a Comment