अरुंधतीसाठी...

काही लोकांची जातकुळीच वेगळी असते. आलेल्या संधीचे तर ते सोनं करतातच, पण त्रासदायक, दु:खद गोष्टीतून पण असं काहीतरी निर्माण करतात की आपण सामान्य माणसाने थक्कच व्हावे.
  
असेच एक व्यक्तिमत्त्व आहे शुभांगी तांबवेकर. बेंगलोरस्थित पॅथॉलॉजीस्ट. त्या जिथे वाढल्या ते घर वाहत्या रस्त्यावर असल्याने लहानपणापासून त्यांनी अनेक अपघात आणि त्याचे परिणाम अगदी जवळून बघितले, काही अगदी जवळची माणसं अपघातात गमावली; पण नियती एवढ्यावरच थांबली नाही. त्यांची तरुण, हुशार मुलगीही जेव्हा अपघाताला बळी पडली – वाहतुकीचे सगळे नियम नीट पाळूनही – तेव्हा मात्र शुभांगीताईंनी हे दु:ख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून कंबर कसली.
आपली लाडकी मुलगी अरुंधती हिच्या स्मृतीनिमित्त श्री. संजय व सौ. शुभांगी तांबवेकर यांनी ‘ द अरुंधती फाउंडेशन’ची स्थापना केली. ‘द अरुंधती फाउंडेशन’ एक विना नफा तत्त्वावर चालणारे, खाजगी फाउंडेशन आहे. 


अरुंधती फाउंडेशन वेबसाईट
त्याद्वारे विविध उपक्रम राबवले जातात ते खालीलप्रमाणे :-

वेगवेगळे उपक्रम
‘विक्रम’ :-
पहिली गोष्ट म्हणजे रोड सेफ्टीविषयी जागृती केली जाते. या प्रोजेक्टचं नाव आहे ‘विक्रम’. शाळा, कॉलेजेस, मोठमोठ्या संस्था, कॉर्पोरेट कंपन्या अशा ठिकाणी प्रेझेंटेशन देऊन, आकडेवारी सांगून त्याबद्दलची जाणीव वाढवली जाते. बरेचसे अपघात हे निष्काळजीपणामुळे अथवा रस्त्यावरचे खड्डे, सदोष डिझाईनचे रस्ते यांमुळे होतात. बाकीच्या गोष्टींचे जरी आपण काही करू शकत नसलो तरी आपली काळजी घेणे आपल्या हातात असते. भारतात दिवसाला साधारण ४०० लोकं रस्ता अपघातात आपला जीव गमावतात.  म्हणजे तो आकडा तासाला १६ होतो. दर तासाला १६ कुटुंबांमध्ये उलथापालथ होते. यातला सगळ्यात मोठा आकडा आहे १८ ते ४५ वयाच्या लोकांचा. म्हणजे उमेदीच्या वयातली, कर्त्या वयातली माणसं. हे त्या त्या कुटुंबाचंच नव्हे तर संपूर्ण समाजाचं, देशाचंही नुकसान आहे. या आकडेवारीचा लोकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यांचे डोळे उघडतात म्हणा ना!
अरुंधती फाउंडेशनला पाठिंबा देऊ इच्छिणारे लोक वेगळ्या प्रकारेही हे करतात. रस्त्यावरचे खड्डे, जिथे दुरुस्तीची गरज असेल असे भाग याबद्दल संबंधित अधिकाऱ्याला पत्र लिहून, त्याचा पाठपुरावा करून ते दुरुस्त करून घेणे एक प्रकारे या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणेच आहे. अशाच प्रकारच्या कामाची जिथे गरज असेल तिथे कधीकधी शुभांगीताई स्वत: कामाला लागतात. आसपासचे रहिवासी, आजूबाजूच्या शाळा-कॉलेजामधील विद्यार्थी यांना मदतीला घेउन, श्रमदान करून जे असेल ते काम करून तो प्रश्न सोडवून टाकतात.

शाळांमध्ये जेव्हा जागृतीसाठी सेशन घेतले जाते तेव्हा मुलांची चाचणी घेतली जाते. एक आधी आणि एक नंतर. मुलांना किती समजलं आहे याची चाचपणी करायला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे भरपूर फरक दिसून येतो. तसंच, संस्था, कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरेमध्ये, आता यापुढे आम्ही वाहतूक नियम पाळू असे जाहीर करणारे एक प्रतिज्ञापत्र दिले जाते. बंधनकारक नसतानाही बहुतेक जण हे प्रतिज्ञापत्र भारतात ही बाब उल्लेखनीय आहे. 

‘आभा’ :-        

अरुंधती अतिशय हुशार, संवेदनशील कवयित्री, उत्तम नर्तिका, सुरेख स्केचिंग करणारी, अत्यंत प्रामाणिक आणि मेहेनती डॉक्टर होती. वेल्लोरमधल्या कॉलेजमध्ये क्लिनिकल पॅथॉलॉजीचा डिप्लोमा करणारी विद्यार्थिनी होती. तिच्या स्मृतीनिमित्त वेल्लोरमधल्या तिच्या कॉलेजमध्ये पॅथॉलॉजीसाठी सुवर्ण पदक सुरू करण्यात आले आहे. यात फक्त अभ्यासातले मार्कच नव्हे, तर सिन्सिअरीटी, दुसऱ्यांना शिकवायची  हातोटी, कामाप्रती निष्ठा असे बरेच निकष असतात. अरुंधतीमध्ये तिच्या शिक्षकांना जे जे गुण दिसले होते, त्यावरून त्या शिक्षकांनी ठरवलेली रेटिंग स्केल वापरली जाते. ते गुण असणाऱ्या विद्यार्थ्याचीच निवड या पदकासाठी केली जाते. या स्कीमला ‘आभा’ असे नाव दिले आहे.

‘आदिती’:-
दुसरी एक स्कीम आहे, ‘आदिती’ नावाची. त्याद्वारे पॅथॉलॉजीचा पदवीपूर्व अथवा पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या लायक विद्यार्थिनीसाठी एका विशिष्ट रकमेपर्यंतच्या किमतीची पुस्तके दिली जातात.

निम्न आर्थिक स्तरात असणारे लोक आपल्या मुलांना, शिक्षणाचा चांगला दर्जा असणाऱ्या शाळांमध्ये घालतात, पण पुस्तकांच्या किमती वगैरे त्यांच्यासाठी डोईजड होतात. अशा आर्थिक वर्गातल्या गरजू विद्यार्थ्यांनाही या योजनेअंतर्गत अभ्यासाची पुस्तकं दिली जातात.

‘ध्वनी’:-
‘ध्वनी’ या योजनेअंतर्गत सदोष श्रवणशक्ती असणाऱ्या – दर वर्षी एका व्यक्तीला – श्रवणयंत्र अथवा ‘स्पीच थेरपी’साठी देणगी दिली जाते.

‘अरुंधती फाउंडेशन’ बद्दल अजून जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर किंवा यातल्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल तर खालील वेबसाईटला भेट द्या.
http://www.thearundhatifoundation.org.in/

   मुलाखत आणि शब्दांकन
   रश्मी साठे

3 comments: